महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकरचा मुद्द्यावरून सुरु केलेले राजकारण हिंदूंचे नुकसान करणारे ठरत आहे. मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या नादात हिंदूंच्या सण उत्सवातही आता भोंगे वापरावर मर्यादा येऊ शकतात. आता मुस्लीम समाजाने स्वतः पहाटेची अजान बंद केली आहे, पण काकड आरतीही बंद झाली. या वादात मनसेमुळे हिंदूचेच अधिक नुकसान झाले असून त्र्यंबकेश्वर आणि शिर्डीची काकड आरती बंद झाली, हे पाप कोणाचे? असा सवाल प्रदेश काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी उपस्थित केला.
भोंग्यावरून सुरु असलेल्या राजकारणावर तोफ डागताना सचिन सावंत म्हणाले की, लाऊडस्पिकर प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन करा असे म्हणत राज ठाकरे यांनी लाऊडस्पिकरचा मुद्दा पुढे आणला आणि त्याला भारतीय जनता पक्षानेही साथ दिली. वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने रात्री १० ते सकाळी ६ पर्यंतच मर्यादा घालून डेसिबलवर नियंत्रण ठेवावे असे म्हटले आहे. त्यामुळे कोठेही या व्यतिरिक्त बंधन नाही. आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन झाले वा रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत कोणी वापर केला तर तक्रार करता येते. मुंबई पोलीस कायद्याच्या ३८(१) अन्वये मुंबईतील पोलीस लाऊडस्पीकर लावण्यास परवानगी देतात. त्यामध्ये किती वेळा व केवढा वेळ वापरण्याचा नियम नाही. शांतता क्षेत्रात परवानगी दिली जाणार नाही.
मुंबईत एकूण २४०४ मंदिरे व ११४४ मशिदी आहेत. कालपर्यंत यातील केवळ २० मंदिराकडे परवानगी आहे. तर ९२२ मशिदींकडे परवानगी आहे. ५ मंदिरांचे व १५ मशिदींचे अर्ज प्रलंबित आहेत. सर्व भोंगे बंद करा हे मनसेचे ऐकले तर मस्जिदींबरोबर २४०० मंदिरांनाही भोंगे वापरता येणार नाहीत तसेच चर्च, गुरुद्वारा, बौद्ध मंदिरांनाही ते वापरता येणार नाही. वर्षभर सार्वजनिक उत्सवांनाही परवानगी मिळणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रात तर जवळपास १५००० मस्जिद असल्या तरी ८०,००० पेक्षा जास्त मंदिरे आहेत. मस्जिदी अनधिकृत म्हणून बोंब मारताना अनधिकृत मंदिरांचे प्रमाणही प्रचंड आहे हे विसरता कामा नये. मनसेचे अज्ञान किती आहे हे यातून दिसते.
राजकीय स्वार्थापोटी मनसेची भूमिका व बौध्दिक दिवाळखोरीतून आलेला हा अविचार योग्य का अयोग्य जनतेने ठरवावा. पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत सर्वधर्मीय प्रतिनिधींनी मनसेच्या मागणीला निकराचा विरोध केला आहे. लाऊडस्पिकरचा मुद्दा हा राजकीय नसून सामाजिक आहे हे राज ठाकरे म्हणत असले तरी त्याला राजकीय किनार आहे हे लपून राहिलेले नाही. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला निशाणा बनवण्याच्या नादात मनसे व भाजपा दोघेही उघडे पडले असून राजकीय फायद्यासाठी सुरु केलेल्या या ‘भोंगे बंद’ मुळे हिंदू समाजाचे मोठे नुकसान होत आहे याचे त्यांना भान राहिले नाही असेही ते म्हणाले.
देशातील भाजपा शासित राज्यांनी भोंग्यांबाबत बोटचेपी भूमिका घेतली याचे कारण स्पष्ट आहे. केवळ महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला बदनाम करण्याच्या प्रयत्नात भाजपा व त्यांचे साथीदार महाराष्ट्राला बदनाम करत आहेत हे दुर्दैव आहे अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Tags hindu-muslim loudspeaker issue mns chief raj thackeray state congress secretary sachin sawant
Check Also
प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा
परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …