Breaking News

नाना पटोले म्हणाले, दंगलीचे पाप झाकण्याबरोबरच जगाने ‘तरंगता गुजरात’ पाहिला स्व. अहमद पटेलांवर भाजपाकडून गलिच्छ आरोप

काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपाने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर भाजपाकडून गलिच्छ आरोप केले जात आहेत, असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, गुजरात दंगल हाताळण्यात नरेंद्र मोदी सरकार सक्षम नव्हते व त्या सरकारची तशी इच्छाही नव्हती हे दिसून आले आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या नरसंहारांने भारताची जगात नाच्चकी झाली. हे पाप नरेंद्र मोदी यांची पाठ सोडत नाही व सोडणार नाही. पण आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ते विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत. सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांना छळण्याचा, त्यांना त्रास देण्याच्या मोदी-शहांच्या षडयंत्राने मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही सोडलेले नाही. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीवर आरोप करण्याचे भाजपाचे गलिच्छ राजकारण दर्शवते. तसेच मयत व्यक्ती या आरोपांचे उत्तर देऊ शकत नाही हे माहित असूनही भाजपाकडून हिन राजकारण केले जात आहे.

ज्या एसआयटीच्या हवाल्याने अहमद पटेल यांच्यावर कपोलकल्पीत आरोप लावले गेले आहेत, ती एसआयटी सरकारची कठपुतळी बाहुली असून सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहे. मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्याबद्दल एका माजी एसआयटी प्रमुखाला दिलेले खास बक्षीस लपून राहिलेले नाही. कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणातील काही तथ्यहीन, खोटा व तथाकथीत भाग प्रसारमाध्यमांना हाताशी धरून प्रसारीत करण्यात मोदी-शहा जोडीचा हातखंडा आहे. विरोधकांची बदनामी करण्याच्या मोहिमेचा तो एक भाग आहे यापेक्षा अहमद पटेल यांच्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून अशा आरोपांचे काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात खंडन करत असल्याचे ते म्हणाले.

गुजरातमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे. तथाकथित गुजरात विकास मॉडेलची पोलखोल झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने ‘तरंगता गुजरात’ जगाने पाहिला आहे. केंद्रातही भाजपा सत्तेत असून महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था हाताळण्यात मोदी सरकार सपशेल फेल झाले आहे. भाजपाकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसची बदनामी करण्याचा हा डाव आहे. परंतु अशा बदानामीला काँग्रेस पक्ष घाबरत नाही व जनतेलाही भाजपाचे कारनामे माहित असल्याचे ते म्हणाले.

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित…
भारतीय जनता पक्ष राजकारणाची सर्व मर्यादा सोडून वागत आहे. विरोधकांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याची त्यांची खोड जुनीच आहे. भाजपाच्या गलिच्छ राजकारणात त्यांनी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींवरही खोटेनाटे आरोप लावून त्यांना बदनाम करण्याचे काम केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे अतिरेक्यांचे संबंध जगजाहीर आहेत. कुख्यात दहशतवादी मसूर अजहर याला सरकारी लवाजाम्यासह तत्कालीन भाजपा सरकारनेच सोडून दिले होते. याच मसूद अजहरने त्यानंतर भारतात अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या. जम्मू काश्मीर मध्ये अटक करण्यात आलेल्या दोन अतिरेक्यामध्ये भाजपाचा एक पदाधिकारी होता. मध्य प्रदेशात केलेल्या कारवाईत अटक केलेल्यामध्येही भाजपाचा पदाधिकारी होता, अशा अनेक प्रकरणात भाजपाचे संबंध उघड झाले आहेत. मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी केवळ निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुस्लीम रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *