राष्ट्रीय राजकारणात शिवसेनेने प्रवेश केल्याने मुंबईत मराठीच्या मुद्यावरून शिवसेनेकडून घेण्यात येत असलेल्या भूमिकेत आता थोडासा बदल झाल्याचे दिसून येत असून आज शिवसेना प्रवक्ते संजय राऊत आणि नेते आदित्य ठाकरे हे उत्तर प्रदेशातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी गोरखपूर येथे आले आहेत. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत म्हणाले की, मुंबईत हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून १० पैकी ६ जण हे हिंदीत बोलत असल्याची माहिती देत मला स्टेजवर आल्यानंतर मुंबईतल्या सभेतच बोलायला आल्याचे वाटल्याची भावना बोलून दाखविली.
संजय राऊत यांनी या प्रचारसभेत बोलताना यंदाच्या निवडणुकांनंतर उत्तर प्रदेशात शिवसेनेचा पहिला मंत्री होईल, असा दावा करत ते पुढे म्हणाले की, जेव्हा मी स्टेजवर आलो, तर मला वाटलं मी मुंबईतच सभा घेतोय. राजू श्रीवास्तव यांच्या हातात शिवसेनेचा धनुष्यबाण आहे. हा धनुष्यबाण बाळासाहेब ठाकरेंचा आहे. या धनुष्यबाणानं देशाच्या शत्रूंचा वारंवार खात्मा केला आहे. हा धनुष्यबाण घेऊन तुम्ही राज्याच्या विधानसभेत जाल आणि शिवसेनेचे पहिले मंत्री देखील व्हाल असे वक्तव्यही केले.
आम्ही जेव्हा मुंबईत फिरतो, मुंबईपासून पुण्यापर्यंत कुठेही जातो, तेव्हा लाखो हिंदी भाषिक लोक दिसतात. मुंबईत म्हणाल तर अर्धी मुंबई हिंदी भाषेत बोलते. त्यातही जिथे आम्ही जातो, तिथे १० पैकी ६ लोक सिद्धार्थनगरचे असतात. हे आमचं नातं आहे उत्तर प्रदेशशी असेही त्यांनी खास आठवण सांगितली.
शिवसेना द्वेषाचं राजकारण कधीच करत नाही. आमच्या हातात हिंदुत्वाचा भगवा आहे, पण त्यासोबत शीख, मुसलमान, ख्रिश्चनही आहेत. आम्ही देशभक्तीचं राजकारण करतो. कुणाच्या शरीरात कुणाचं रक्त आहे, हे १० मार्चला कळेल. तुमचं रक्त काय आहे, तुमच्या रक्तात काय फिरतंय ते इथली जनता १० मार्चला दाखवून देईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.