Breaking News

शरद पवार यांचा राज्यपाल कोश्यारींवर पुन्हा निशाणा लोकशाही आणि राज्यघटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही

बारामती : प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या इतिहासात लोकशाही आणि राज्यघटनेची असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला असल्याची नाराजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली.

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात राज्य सरकारने प्रस्ताव पाठवूनही राज्यपालांनी अद्याप त्यावर निर्णय घेतला नसल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी यांनी हे वक्तव्य करत पुन्हा एकदा निशाणा साधला.

बारामती येथे आज पत्रकारांशी ते बोलत होते.

राज्यपालांकडे जी जबाबदारी असते आणि घटनेने राज्य सरकारला व मंत्रिमंडळाला जे अधिकार आहेत, त्या अधिकारानुसार शिफारशी झालेल्या गोष्टींची अंमलबजावणी करणे ही जबाबदारी राज्यपालांची असते. आमची अपेक्षा अशी होती की मोदीसाहेब स्वतः ते जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यावेळी राज्यपालांकडून त्यांना अशा प्रकारची अडवणूक होत असल्याची त्यांची तक्रार होती. तसे त्यांनी अनेकदा बोलून दाखवले होते हे माझ्या पाहणीत आहे. दुर्दैवाने त्यांना हे सहन करावं लागलं हे त्यांच्या राज्यात सुध्दा. महाराष्ट्रासारख्या राज्यात राज्यपाल जे करतायत त्यात केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेतेय ही गोष्ट चिंताजनक आहे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड आहे – शरद पवार

आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल अशी खात्री त्यांनी व्यक्त करत पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे. परंतु लोक निर्णय घेत असतात पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे. त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत. राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नसल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

तामिळनाडूमध्ये आजच्या परिस्थितीत लोकांच्या मनाचा कौल हा स्टॅलिन, डीएमके यांच्याबाजूने आहे. ते राज्याचं सूत्र हातात घेतील लोक त्यांना मोठ्या संख्येने पाठिंबा देतील असे भाकितही त्यांनी यावेळी केले.

पश्चिम बंगाल मध्ये केंद्र सरकार विशेषतः भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. तिथे एकटी भगिनी आपल्या राज्यातील लोकांसाठी संघर्ष करतेय. तिच्यावर राजकीय हल्ला करण्याची भूमिका भाजपने घेतली आहे. बंगालमधील लोक स्वाभिमानी आहेत. त्यांच्या बंगाली संस्कृती व बंगाली मनावर कुणी आघात करण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण राज्य एकसंघ होते आणि त्याची प्रतिक्रिया व्यक्त होते. त्यामुळे कुणी काही म्हटले तरी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकार येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *