मुंबईः प्रतिनिधी
भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करुन अटक करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केली.
केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या मंत्र्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालून अशाप्रकारचे मंत्री आहेत, त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
एका बाजूला गोहत्येच्या नावावर मुस्लिम समाजाच्या विरोधात मॉबलिचिंगचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे मतांसाठी गोहत्या करा असं मुस्लिम समाजाच्या लोकांना सांगायचं असे मंत्री केंद्रात असतील तर देशात काय सुरु आहे हे लक्षात येत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, भोकरदन येथील प्रचाराच्या कालावधीत कठोरा या मुस्लिमबहुल भागात केलेल्या भाषणाचा भाग समाजमाध्यमावर फिरत आहे. मात्र हे भाषण कोणत्याही संदर्भाशिवाय आणि त्यात काटछाट करून प्रसारीत करण्यात आले आहे. तसेच गो-हत्येच्यासंदर्भात आपण कोणतेही वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे सदरचे वृत्त निरर्थक असल्याचा खुलासा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.