मुंबई : प्रतिनिधी
राज्यसभेवर महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक होत असून या निवडणूकीसाठी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस
आणि शिवसेनेने प्रत्येकी एक उमेदवार उभा केला. तर भाजपकडून सुरुवातीला तीन जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार होते. मात्र ऐनवेळी ४ था उमेदवार अर्थात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांना अर्ज भरायला लावून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोटात गोळा निर्माण उभा केला. परंतु आज गुरुवारी रहाटकर यांनी अर्ज मागे घेत या सहा उमेदवारांचा बिनविरोध विजय निश्चित केला.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी काँग्रेसकडून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून वंदना चव्हाण आणि शिवसेनेकडून विद्यमान राज्यसभा खासदार अनिल देसाई यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपक़डून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाचे प्रमुख नारायण राणे यांना उमेदवारी देत केरळचे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे आणि भाजपचे पदाधिकारी व्ही. मुरलीधरन यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र व्ही. मुरलीधरन यांच्या कागदपत्रांच्या तांत्रिक कारणामुळे उमेदवारी अर्ज रद्द ठरण्याची शक्यता होती. त्यामुळे भाजपकडून पर्यायी उमेदवारी म्हणून विजया रहाटकर यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला.
काल बुधवारी अर्ज छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज पात्र ठरल्याने सातवा उमेदवार रहाटकर या उमेदवारी कायम ठेवतात की मागे घेतात. याकडे भाजप वगळता सर्व पक्षांचे लक्ष होते. मात्र आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी अर्ज मागे घेतल्याने आता राज्यसभेच्या निवडणूक आडाख्यात असलेल्या सहा ही उमेदवारांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.
या निवडणूकीत प्रत्येक उमेदवाराला ४२ मतांचा कोटा आहे. काँग्रेसकडे दोन संभावित बंडखोर आमदारांची शक्यता गृहीत धरून ४२ मतांची जुळवाजळव करण्यात आली आहे. राष्ट्रवादीनेही ४२ मतांची जुळवाजुळव करण्यात आली आहे. शिवसेनेकडे त्यांच्या उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक असलेली मतांपेक्षा जास्त मते आहेत. तसेच भाजपकडेही त्यांचे तिन्ही उमेदवार निवडून येण्याइतपत मतांची अर्थात आमदारांची संख्या आहे. त्यामुळे विजयांच्या माघारीने सहा जणांचा विजय निश्चित झाला आहे.