मराठी ई-बातम्या टीम
मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विरूध्द भाजपा तर कधी शिवसेना विरूध्द भाजपा असा राजकिय सामना पाह्यला मिळत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आले. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जी काही पब्लिसिटी करायची ती ३ वाजेपर्यंतच करा त्यानंतर संजय राऊत टेक ओव्हर करतील अशी मिश्कील टीपण्णी केली.
शिवसेना खासदार संजय राऊत आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार असून या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत आपण मोठे खुलासे कऱणार असल्याचे जाहीर केले. यावेळी ते कोणत्या गोष्टीचा बॉम्बस्फोट करतात याची उत्सुकता आहे. काय उखडायचं ते उखडा, बघु कोणात किती दम आहे, असं म्हणत त्यांनी भाजपाला खुलं आव्हान दिलं असून पुढील काही दिवसात भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, असा इशारा दिला. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे यास वेगळेच राजकिय महत्व प्राप्त झाले आहे.
सुप्रिया सुळे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी मंचावर बोलताना आपण आत्ताच काय ते बोलून घेऊ, तीन वाजल्यानंतर संजय राऊतांचे षटकार असतील असं मिश्कील भाष्य केले. तसेच कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यांशी बोलतानाही त्यांनी यावर भाष्य केलं.
मलाही विषय माहिती नाही. दुपारी पत्रकार परिषद होणार असून फक्त राज्य नाही तर देश या पत्रकार परिषदकडे अपेक्षेने बघत आहे. संजय राऊत काय म्हणतात हे पहावं लागणार आहे. पण जेव्हा साधारण ते असा इशारा देतात तेव्हा ते राज्याच्या आणि देशाच्या हिताचेच असेल यावर माझा विश्वास असल्याचे त्या म्हणाल्या.
मुंबईत ईडीकडून धाडी सुरु असून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापकर करत दबाव आणला जात आहे का? असं विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, मी संसदेतही या विषयावर बोलले आहे. केंद्र सरकार सातत्याने इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआयचा गैरवापर करत आहे. विरोधी पक्षातच या नोटीस कशा येतात याचा सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. विरोधात असताना येणाऱ्या नोटीशी भाजपात गेलात की कुठे जातात ते देवाला माहित. ही दडपशाही असून सातत्याने लोकांना केंद्र सरकार घाबरवत आहे.
या देशात कोणत्याही राज्यात झालेल्या घोटाळ्याची जबाबदारी केंद्राने घेतली पाहिजे. सात वर्षांपासून यांचंच सरकार देशात असताना मग काय करत होते? याची व्यापक चर्चा संसदेत करणार आहोत असल्याचे सांगत किरीट सोमय्या हे टीव्ही मालिकेप्रमाणे रोज पत्रकार परिषद घेऊन आरोप करत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.