औरंगाबाद येथील जाहिर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी धक्कादायक विधान करत छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार करत त्यांनी केलेल्या दाव्यातील हवा काढून घेतली.
धडधडीत सांगता लोकमान्य टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली म्हणून जेव्हा महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधली. तेव्हा लोकमान्य टिळक हे फक्त चौदा वर्षाचे होते. त्यामुळे महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली हे सांगायला लाज वाटती का? असा खोचक सवालही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात मंत्री जितेंद्र आव्हाड हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते.
राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही कधी यशस्वी होऊ देणार असा स्पष्ट इशाराही त्यांनी यावेळी दिला.
औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले आणि अभ्यासपूर्ण संदर्भ देऊन प्रतिवाद केला.
तुम्हाला भोंग्यावर बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
महाराष्ट्रात जेवढे म्हणून संत झाले त्या सर्वांनी वेद-पुराण नाकारले आहेत. संत ज्ञानेश्वर घ्या, संत तुकारामा, संत एकनाथ, चक्रधर स्वामी, बसवेश्वर या सर्वांनी वेद नाकारले. या वेद-पुराणांनी स्त्रियांना अधिकार नाकारल्याचेही त्यांनी सांगितले.