मागील १० दिवसांपासून हनुमान चालिसा प्रकरणी तुरुंगात असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा हे तुरुंगात आहेत. मात्र त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु आजही न्यायालयालयाने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर आजच्या ऐवजी बुधवारी निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने आजही राणा दाम्पत्याला दिलासा मिळू शकला नाही.
गेल्या आठवड़्यात राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील दोन्ही बाजूला युक्तीवाद पूर्ण झाला. मात्र लगेच त्यावर निकाल देण्याऐवजी सोमवारी निकाल देणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले. त्यानुसार आज दुपारी जामीन अर्जावर मुंबई न्यायालयाचे न्यायमुर्ती आर.एन.रोकडे आज दुपारी जाहीर करणार असल्याचे जाहीर केले. मात्र दुपारी पुन्हा त्यांनी संध्याकाळी ५ वाजता निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले. अखेर संध्याकाळी ५ वाजता न्यायाधीशांनी बुधवारी सकाळच्या सत्रात निकाल जाहीर करणार असल्याचे जाहीर केले.
तसेच राणा दांम्पत्याच्या जामीन अर्जावरील निर्णय हा वेळेअभावी डिक्टेट करता आली नाही. त्यामुळे ऑर्डरचे डिक्टेशन पूर्ण करून बुधवारी जामीन अर्जावर निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
त्यामुळे राणा दाम्पत्याची अक्षय तृतीयाही आता तुरुंगातच साजरी होणार असल्याचे स्पष्ट झाले. राणा दाम्पत्याला पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतरही नवनीत राणा आणि रवि राणा यांनी दूरचित्रवाणी माध्यमातून राज्य सरकारला आव्हान दिल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. तसेच त्यांच्या विरोधात दोन गटांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांनी घरचे जेवण मिळावे म्हणून न्यायालयात अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांना घरचे जेवण देण्याच्या विनंती फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे नवनीत राणा आणि रवि राणा यांना तुरुंगात मिळणारेच जेवण जेवावे लागत आहे.
दरम्यान खासदार नवनीत राणा यांना भायखळा येथील महिला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तर आमदार रवि राणा यांना तळोजा येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जामीनावर आज निकाल येणार असल्याने या दोघांना न्यायालयात आणण्यात आले नाही. त्यामुळे या दोघांना तुरुंगातच ठेवण्यात आले होते. या दोघांच्यावतीने त्यांचे वकील रिजवान मर्चंट हे न्यायालयात हजर होते.