राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक असल्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यावरून भाजपाने अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवित त्यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन केले. या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या यांनी अजित पवारांच्या कामाचे कौतुक करत कधी कधी अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री वाटतात असे वक्तव्य करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ऊर्फी जावेद प्रकरणावरून मला जशी मुलगी आहे तशी तुमच्याही घरी असल्याची आठवण करून दिली.
सुप्रिया सुळे या पुण्यात एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधी सोबत संवाद साधला.
बेळगाव प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही भूमिका मांडताना दिसत नाही. त्यावर त्या म्हणाल्या की, बेळगाव प्रश्नावर अमित शाह यांच्यासोबत महाविकास आघाडीतील खासदाराची बैठक झाली. त्याबद्दल मी अमित शाह यांचे आभार मानते. त्यावर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून चर्चा केली. याप्रकरणी कोणी काही बोलणार नाही. न्यायप्रविष्ट बाब असल्याच अमित शाह यांनी त्यावेळी सांगितले होते. तरीदेखील कर्नाटकचे मुख्यमंत्री सतत विधान करीत आहेत. ऐरवी आपले ईडी सरकार सतत बोलत राहतात. पण यावर काही बोलण्यास तयार नसून दोघे जण बोटचेपी भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असून कोणीही यावं आणि महाराष्ट्राला टपली मारून जावे. आम्ही हे कधीच सहन करणार नाही. या कृतीतून महाराष्ट्राच महत्व कमी करण्याच काम अदृश्य हात करीत असल्याचे सांगत भाजपावर टीका केली.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी उर्फी जावेद आणि अन्य महिलांच्या प्रकरणावरुन भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्यांमध्ये सध्या टीका टिप्पणी सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्तेच टीकेला सुरुवात करतात असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले.
या वादावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा असून महिलांचा सन्मान करणारा आहे. ती महिला कोणाची तरी आई, बहीण, पत्नी आणि मैत्रीण आहे. त्यामुळे देवेंद्र जी माझ्या घरात जशी एक मुलगी आहे. तशी तुमच्या घरात देखील एक मुलगी आहे. त्यामुळे महिलांवरील आरोप प्रत्यारोप थांबले पाहिजे. गलिच्छ राजकारण थांबले पाहिजे. या सर्व घडामोडी लक्षात घेता, माझी देवेंद्र फडणवीस यांना विनम्र विनंती आहे की, आपण उपमुख्यमंत्री म्हणून पुढाकार घ्यावा. आम्ही महाविकास आघाडी म्हणून निश्चितच पुढे येऊ, अशी मागणीही त्यांनी केली.