मुंबई: प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी शनिवारी रात्री रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्या एका कंपनीच्या व्यवस्थापकाला व मालकाला ताब्यात घेतले असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांनी हस्तक्षेप करून पोलिसांवर दबाव टाकून त्याला सोडवले आणि तो साठा भाजपाने केंद्रीय मंत्र्यांच्या परवानगीने मिळवल्याचा दावा केला. वास्तविक रेमडेसिवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली? केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? असा सवाल करत महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणा-या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली.
५० हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मुंबईत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली व ब्रुक फार्मा कंपनीच्या एका अधिका-याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करून ते रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ जनतेला उपलब्ध करून दिले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली.
आज राज्यात रेमेडीसीवर, ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुडवडा असून केंद्र सरकार राज्याबरोबर आणि राज्यातील जनतेबरोबर जे घाणेरडे राजकारण करत आहे ते निषेधार्ह आहे. रेमडेसीवरच्या तीव्र टंचाईच्या पार्श्वभूमीवर काही कोटींचा रेमडेसीवरचा साठा कुठून आला ? याचा काळा बाजार करणारे ते कोण आहेत? या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळाली पाहिजेत आणि फडणवीस यांनी दाखवलेले ते पत्र सार्वजनिक केले पाहिजे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भानगडीत जनता भरडली जाणार नाही याची खबरदारी घेऊन या संकटात आपण जनतेला सर्व प्रकरणाची आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी आणि कोरोनाच्या या महामारीत जनतेचे जीव वाचवण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करावेत असे आवाहनही त्यांनी केले.