लोकसभा निवडणूक झाली तर शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होणार असून महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज ‘सी-वोटर’च्या सर्व्हेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गट, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना महाविकास आघाडीने त्यांच्या सध्याच्या जागा राखल्या तरी खूप झाले, असे विधान केले. तर सी वोटर सर्व्हेच्या अंदाजापेक्षाही जास्त जागांवर आमचा विजय होईल, असा दावा महाविकास आघाडीकडून केला जात आहे. यावर आता शिंदे गटातील नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवारांच्या पावसातील सभेचा उल्लेख करत हे अंदाज फेटाळले.
यावेळी बोलताना संजय शिरसाट म्हणाले, २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात सभा घेतली होती. ही सभा तेव्हा चर्चेचा विषय ठरली होती. या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वातावरण बदलले होते. याच सभेचा आधार घेत संजय शिरसाट यांनी सी वोटरचा सर्व्हे खरा ठरणार नाही, असा दावा करताना म्हणाले, सर्व्हेवर अंदाज बांधता येत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची पावसात एक सभा झाली होती. त्या सभेने सगळे गणित बदलून टाकले. त्या सभेने सर्व सर्व्हे गुंडाळून टाकले होते. त्या सभेनंतर पश्चिम महाराष्ट्रात वेगळे वातावरण तयार झाले होते. तेथील उमेदवारदेखील पावसाला आताच यायचं होतं का? असे म्हणत होते. सर्व्हेचा अंदाज फक्त त्यांच्या समाधानासाठी चांगला आहे, अशी उपरोधिक टीका केली.
संजय राऊतांना या सर्व्हेमुळे खूप आनंद झाला असेल. मात्र प्रकाश आंबेडकरांनी त्यांना त्यांची लायकी दाखवली. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा युती झाली होती, तेव्हाच मी म्हणालो होतो; की ही युती किती काळ चालेल हे सांगता येत नाही. लोकसभा निवडणूक सध्या दूर आहे. जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक होईल, तेव्हा यांच्यातील मतभेद बाहेर येतील. या मतभेदांनी आता टोक गठले आहे. आघाडीत कधीही बिघाडी होऊ शकते, असा दावाही त्यांनी केला.