एखाद्या व्यक्तीने जर देशाच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरोधात जर कोणी अवमानकारक टीपण्णी केली असेल तर त्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई सरकारने करायला हवी. मात्र सांगली येथील भिडे हा राष्ट्रपित्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य करूनही त्याच्यावर राज्य सरकारने अद्याप कोणतीही कारवाई केली नाही. तो व्यक्ती अद्याप बाहेर कसा ? असा सवाल करत त्याच्यावर कारवाई करणार की नाही असा सवालही काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत उपस्थित केला.
त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सदर विषयाची नोंद घेतली असून राज्य सरकारने योग्य ती कडक कारवाई करावी असे निर्देश दिले.
समाधान न झाल्याने पृथ्वीराज चव्हाण पुन्हा म्हणाले, देशाच्या राष्ट्रपित्यांबद्दल अनुद्गार काढणारा व्यक्तीवर आयपीसी कलम १५३ खाली आणि अन्य असतील त्या कलमाखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत ते पुढे म्हणाले तो व्यक्ती अजूनही बाहेर फिरतो आहे. वास्तविक पाहता राष्ट्रपुरूषांबद्दल अनुद्गार काढून समाजात तणाव निर्माण करण्याचे अथवा बिघडविणारी वक्तव्य या भिडे कडून काही पहिल्यांदाच झालेले नाही. यापूर्वीही या व्यक्तीकडून सातत्याने अशा पध्दतीची वक्तव्य करण्यात येत आहे. उद्या जर कोणी वानगीदाखल काही वेगळी प्रतिक्रिया व्यक्त केली तर असे सूचक वक्तव्य करत त्याची जबाबदारी कोणावर राहील सरकार त्याची जबाबदारी घेणार आहे का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात वक्तव्य करावे अशी मागणी केली. त्यामुळे विधानसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकार भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची माहिती तपासून योग्य ती कारवाई करेल असे आश्वासन दिले.
परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याने समाधान न झाल्याने पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि इतर नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत भिडे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
त्यावर पुन्हा राहुल नार्वेकर यांनी पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही आता सभागृहाला माहिती दिली आहे. मी सरकारला आदेशही दिले आहेत. तरीही तुम्ही तसेच आग्रही मागणी करत आहात. मुख्यमंत्री म्हणतायत ना की वक्तव्य तपासून योग्य ती कारवाई करणार म्हणून.
त्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्य सरकारने याप्रकरणाची नोंद घेतली आहे. त्यांची योग्य ती तपासणी करून त्यातील गांभीर्य तपासून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पुन्हा आश्वासन विरोधकांना दिले. त्यानंतर पुढील कामकाज सुरुळीत झाले.
दरम्यान, महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. यावरून शुक्रवारी २८ जुलै विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.