आगामी लोकसभा निवडणूका जाहिर होण्यास आता काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखालील शिंदे गट-अजित पवार गट महायुतीतील काही निवडक जागा त्यांच्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर लढविण्याची तयारी केलेली आहे. परंतु महाराष्ट्राच्या दौऱ्यावर एक दिवसीय दौऱ्यावर आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी काल संध्याकाळी घेतलेल्या धावत्या भेटीत फक्त शिंदे गटाच्या आणि अजित पवार यांच्या गटाच्या काही निवडक जागा वगळता अर्थात चार जागा वगळता दोन्ही गटाचे सर्व उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढवतील असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवर गटाला मोठा धक्का बसला आहे. तर शिंदे गटाचे प्रमुख नेते तर भाजपाच्या अल्टीमेटमवर पर्याय शोधण्याच्या कामात व्यग्र झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
शिंदे गटाकडे सध्या १३ खासदार आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठा गटाकडे ५ खासदार आहेत. त्यातच शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह याविषयी विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाच्या विरोधातील शिवसेना उबाठा गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र या याचिकेवर अद्याप सर्वोच्च न्यायालयाकडून अद्याप निकाल दिला नाही. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेवरही सध्या लटकती तलवार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत ही अवस्था तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळे अजित पवार यांच्या गटाने लोकसभा निवडणूकीसाठी ५ जागा मागितल्या आहेत. त्यात मावळ, बारामती, पुणे, शिरूर आणि गोंदिया या पाच मतदारसंघातील जागा मागितल्या आहेत.
तर ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे चिरंजीव डॉ श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याशिवाय मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील मिळून १३ खासदार आहेत. मात्र भाजपाने ठाणे जिल्ह्यातील डॉ श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ वगळता इतर ठिकाणी शिंदे गटाच्या खासदारांना निवडणूक लढवायची असेल तर कमळाच्या चिन्हावर लढवावी लागेल धनुष्यबाणाच्या चिन्हावर नाही असे भाजपाच्यावतीने या दोन्ही गटाच्या प्रमुखांना सांगण्यात आले आहे. अशाच प्रकारचा निरोप अजित पवार गटाच्या नेत्यांना दिला असून बारामती आणि रायगड येथील लोकसभा मतदारसंघाची जागा वगळता बाकीच्या ठिकाणचे उमेदवार हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील असेही स्पष्टपणे भाजपाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
दरम्यान दिल्लीहून आलेल्या अमित शाह यांनी या दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांना स्पष्ट सांगितले की, नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे, आणि जर या दोन्ही गटाच्या मागणीप्रमाणे जर त्यांच्या पक्ष आणि चिन्हावर तर उमेदवारी दिली आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला तर विधानसभा निवडणूका होण्याआधीच दोन्ही गटाचे आमदार आणि निवडूण आलेले खासदार हे अपात्र ठरतील. त्यामुळे महत्वाची दोन-चार जागा वगळता बाकिच्या जागांवर भाजपाच्या कमळ या चिन्हावर उमेदवार उभे करून लोकसभा निवडणूका जिंकण्याची भाजपाने ठरविल्याचा निर्णय कळविण्यात आला आहे.
मात्र भाजपाच्या या निर्णयाला अजित पवार गटाने आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अद्याप होकार कळविला नाही. परंतु सोबत आलेल्या आमदार खासदारांना काय कारण सांगायचे आणि मतदारांना कोणत्या तोंडाने उत्तर द्यायचे अशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दोन्ही गटांच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.