मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच चिक्की घोटाळा प्रकरणात क्लीनचीट दिली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार हे ‘क्लीन-चीटर’ सरकार असून चिक्की खरोदीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या विरोधात तक्रार केली. त्यांच्याच कडून लाचलुचपत विभागाने अभिप्राय घेत चोराच्या साक्षीवर मंत्र्याला क्लीन चीट दिल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत घोटाळेबाजांना शासन होईपर्यंत याप्रकरणाचा पाठपुरावा करत राहणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी केले.
चिक्की खरेदीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार आणि नियमांची पायमल्ली झाली असून या संदर्भातले पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देऊनही दोन वर्षे झाली तरी या विभागाने काहीही कारवाई केली नव्हती. काँग्रेसने तक्रार केल्यानंतर तीच तक्रार महिला व बाल कल्याण विभागाकडे पाठवित त्यांच्याकडून अभिप्राय मागवण्यात येत असल्याचे थातूर मातूर उत्तर एसीबीकडून देण्यात आले आहे. याप्रकरणात महिला आणि बालकल्याण विभाग दोषी असतानाही त्याच विभागाकडून स्पष्टीकरण मागण्याची भूमिका एसीबीने घेतल्याबाबत त्यांनी आश्चर्यही व्यक्त केले.
२०६ कोटी रूपयांची महिला बालविकास विभागाने केलेली खरेदी हा केवळ घोटाळा नाही तर दिवसा ढवळ्या घातलेला दरोडा आहे. ज्यांनी पुरवठा केलेला आहे त्यांच्या नोंदणीकृत कारखान्यात वा कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करण्यात आलेली आहे. सूर्यकांता चिक्की पाकिटावरील कस्टमर केअर एव्हरेस्ट इंडस्ट्रीजच्या दर करारावर 9823322798 हा एकच मोबाईल क्रमांक आहे. कंपन्या वेगळ्या आणि पत्ते वेगळे पण मोबाईल क्रमांक मात्र एकच असून त्याची चौकशी केली असती तर यामागे असलेल्या माफियांचा खरा चेहरा जगासमोर आला असता. मात्र सरकारने चिक्की घोटाळ्यातील माफियांना संरक्षण देण्याचे काम करत असून गोरगरिब मुलांच्या तोंडी चिक्कीतून माती घालणा-या सरकारला जनाची नव्हे तर मनाचीही लाज राहिली नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.