मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्यांचे वाढते प्रमाण, मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचे प्रकार व त्यात आता सुशिक्षित बेरोजगारांची पडलेली भर पाहता फसणवीस सरकार राज्यातील जनतेसोबत ‘ब्ल्यू व्हेल गेम’ खेळत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
मंत्रालयात अविनाश शेटे या सुशिक्षित बेरोजगार तरूणाने आत्महत्येचा प्रयत्न केला. या दुर्देवी घटनेवर विषाद व्यक्त करताना सावंत म्हणाले की, या सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांच्या आत्महत्यांचा उच्चांक मोडला आहे. गेल्या साडेतीन वर्षात १३ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या. याच सरकारच्या कालावधीमध्ये शेतक-यांनी मंत्रालयात येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकार राज्याला प्रथमच दिसले. यात आता सुशिक्षित बेरोजगारांचीही भर पडली आहे. या सर्व प्रकारांना फडणवीस सरकारची अनास्था, खोटी आश्वासने देऊन केलेली, खोटी जाहिरातबाजी करून केलेली दिशाभूल तसेच शेतक-यांच्या मुलांनी नोक-या शोधू नये किंवा बेरोजगारीच्या प्रश्नावर पकोडा तळणे हा रोजगार आहे, अशी बेताल वक्तव्ये कारणीभूत आहेत. शेतक-यांच्या आणि युवकांना रोजगार देण्याच्या प्रश्नावर हे सरकार सपशेल अपयशी ठरले असून बेजबाबदार कृत्ये करून आणि चुकीची धोरणे राबवून हे सरकार राज्यातील जनतेशी खतरनाक ‘ब्ल्यू व्हेल गेम’ खेळत आहे असे सावंत म्हणाले.