विरोधकांनी विधानसभेत मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांन केलेल्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिले. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सत्तांतर झाल्यानंतर बऱ्याच कालावधीनंतर आम्ही वर्षावर गेलो. मात्र ज्या अंधश्रध्देच्या विरोधात प्रबोधनकार ठाकरे यांनी आघाडी उघ़डली, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदूत्वासाठी पुढाकार घेतला. त्या सर्व विचारांना त्यांच्या सुपुत्राने मुठमाती दिली. जेव्हा आम्ही वर्षावर गेलो त्यावेळी आम्हाला पाठीभर लिंब मिळाल्याचा खोचक टोला लगावला.
यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही बाहेर पडल्यानंतर ते काय काय बोलत होते. काय त्यांचे शब्द होते. मी जेव्हा हेलिकॉप्टरने शेताला गेलो. तेव्हा ते म्हणाले, हेलिकॉप्टरने शेताला जाणारा शेतकरी दाखवा आणि एक लाख रूपये मिळवा अशी टीका केली. पण आता मी म्हणतो कि घरात बसणारा मुख्यमंत्री दाखवा आणि दोन लाख मिळवा असा पलटवारही उध्दव ठाकरे यांच्यावर केला.
त्याचबरोबर हिऱ्या पोटी गारगोटी असा खोचक टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला.
इतकेच नाही तर आम्ही बाळासाहेबांचे फोटो चोरले म्हणत आता आमची हिंमत हिसकावून दाखवा असे टीका करत फोटो काय चोरता मैदानात या असे आव्हानही त्यावेळी त्यांनी दिले. मात्र जो माणूस घरात बसून राहतो, त्याला आव्हान कसे देणार असा खोचक टोलाही मुख्यमंत्री शिंदेंनी लगावला.
कोणी टीका केली म्हणून त्या व्यक्तीवर पलटवार करत आम्ही टीका करत नाही. मी शांत राहतो म्हणजे मी कमजोर आहे असे समजू नका असे आव्हान देत कारण मी शांत आहे मला तुमची सगळी अंडी-पिल्ली माहित आहेत. त्यामुळे मी शांत असल्याचा खुलासाही मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
याशिवाय मागच्या काळात ज्यांनी ज्यांनी राज्यात येणाऱ्या उद्योजकांकडे टक्केवारी मागितल्या, त्या सर्वांची चौकशी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहिर केले.
हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे लोकांसाठी करत असलेल्या कामाची पावती नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत लोकांनी दिली असून आम्ही पाचव्या जागी होतो. आता आम्ही दुसऱ्या स्थानी आहोत. वेळ पडली तर आम्ही सर्व सरपंच दाखवू शकतो असे आव्हान विरोधकांना देत आताच सांगतो हि अडीच वर्षे तर आमचेच सरकार पूर्ण करेल. त्यानंतर ज्या पुढील निवडणूका येतील त्यावेळीही बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी जिंकून पुन्हा सत्तेत येईल असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.