मराठी ई-बातम्या टीम
नवी दिल्लीत सुरु झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या अपयशाची आणि त्यांच्या बेताल वर्तनाची यादीच वाचून दाखविल्या गांधी विरूध्द मोदी असा संघर्ष असा पहायला मिळत असताना राज्यात मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या आव्हानाला भाजपाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी प्रतिआव्हान देत नाना पटोले, हिम्मत असेल तर एकटा सागर बंगल्याच्या जवळ तरी येवून दाखव नाही उलटा प्रसाद दिला तर आम्हीही भाजपावासी नसल्याची थेट धमकीच दिली.
त्यामुळे आगामी काळात भाजपा आणि काँग्रेसमधील राजकिय लढाई आता हातघाईवर आल्याचे पाह्यला मिळाले तर त्यात आश्चर्य वाटायला नको.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केला होता. काँग्रेसमुळेच देशभर कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा मोदी यांनी केला होता. मोदींच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्र काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. नाना पटोले आणि काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली मागील काही दिवसांपासून राज्यभरात भाजप कार्यकर्ते आणि भाजप नेत्यांच्या घरावर आंदोलन करण्यात येत आहे. तर भाजपकडूनही काँग्रेसला जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत असून आता नाना पटोले यांनी सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर आंदोलनाचा इशारा आज दिला.
पटोले यांच्या इशाऱ्याला मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा आणि भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी प्रतिआव्हान दिले.
आमदार प्रसाद लाड यांनी तर नाना पटोले यांचा थेट एकेरी उल्लेख करत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येऊनच दाखवा, असं थेट आव्हान देत “नाना, तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय. तू उद्या सकाळी १० वाजता येऊनच दाखव, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजपावासी नाही. सागरवर तू ये, पाहतो तू कसा परत जातो ते”, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना थेट धमकीच दिली आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना लाड यांनी पटोलेंना धमकी दिली.
मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी भाजपा कार्यकर्त्यांना नाना पटोले यांच्या स्वागतासाठी तयार राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे सोमवारी काँग्रेसने फडणवीसांच्या बंगल्यावर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, तसेच पंतप्रधान मोदी छत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा भाजपा सदस्य बाके वाजवत होते, असा आरोप करत याचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार असल्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला.
https://twitter.com/PrasadLadInd/status/1492828333683339270?s=20&t=jSl-vxBhUAcoNukV1V-flA