मुंबई: प्रतिनिधी
भीमा कोरेगाव येथील दंगलीप्रकरणी मिलिंद एकबोटे यांना जामिन अर्ज नाकारल्यानंतर त्यांना पोलीसांनी अटक केली आहे. मात्र, याप्रकरणातील मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना सरकारने अटक केली नाही, तर येत्या २६ मार्च रोजी विधानभवनावर धडक मोर्चा काढणार, असा अल्टिमेटम भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर यांनी दिला. मात्र, हा मोर्चा कोणत्याही पक्षाच्या नेतृत्वाखाली काढणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विधानभवनात पत्रकार परिषदेत बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला अल्टिमेटम दिला. भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराला कारणीभूत असलेल्या मलिंद एकबोटे यांना अटक झाली आहे. मात्र संभाजी भिडे हे अजूनही मोकाट आहे. सरकारने २६ मार्च पर्यंत संभाजी भिडे यांना अटक केली नाही तर भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान व सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यावतीने मुंबईत मोर्चा काढण्याचा आंबेडकर यांनी इशारा दिला. भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानशी २५० संघटना जोडल्या गेल्या आहेत. त्यांचे सर्व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. २६ मार्च रोजी मुंबईतील भायखळा येथून या मोर्चाची सुरु होणार आहे. तोपर्यंत सरकारने भिडेंना अटक न केल्यास हा मोर्चा विधानभवनावर धडकेल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. पत्रकार परिषदेला लोकभारतीचे आमदार कपिल पाटील हे देखील उपस्थित होते.
भिडेंवरील कारवाईची राष्ट्रवादीची मागणी
भिमा-कोरेगाव घटनेसंदर्भात मिलिंद एकबोटे यांच्याप्रमाणेच संभाजी भिडे यांच्यावरही कारवाई करावी या मागणीसाठी विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण, जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये यांनी २८९ द्वारे स्थगन प्रस्ताव मांडत सरकारला यावर चर्चा करण्याची मागणी केली. मात्र हा विषय चर्चेचा नाही असे सांगत सभापतींनी चर्चेची मागणी पेâटाळून लावली. दरम्यान विधानपरिषदेमध्ये नियम ९७ अन्वये मुख्यमंत्र्यांनी भीमा कोरेगावप्रकरणी निवेदन केले होते. या निवेदनात तक्रार दाखल असलेले संभाजी भिडे यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. मुख्यमंत्र्यांनी संभाजी उर्फ मनोहर भिडे यांना वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक त्यांच्या नावाचा उल्लेख टाळला असा आरोपही यावेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानपरिषदेत केला.