मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रासह देशात हिंदू व मुस्लिम अशी धार्मिक दंगे होत नाहीत. त्यामुळे आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी यांच्यात जातीय दंगली घडविण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी केला.
भिमा कोरेगांव येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक करण्याचे सत्र राज्य सरकारकडून करण्यात आले. यापार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भिमा कोरेगांव येथील हिंसाचार प्रकरणातील प्रमुख आरोपी मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना वाचवण्यासाठीच एल्गार परिषदेच्या नेत्यांना अटक राज्य सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करत या दंगल भडकवण्यातील दोषी असलेले संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना क्लीन चिट देण्यात येतेय. उलट एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांना अटक होतेय. एल्गार परिषदेच्या नेत्यांचा दंगलीशी काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे, त्यांचा भीमा कोरेगाव दंगलीशी कसा संबंध आहे, याची माहिती सरकारने द्यावी अशी मागणी करत हिंदू- मुस्लिम समाजात दंगे घडवण्यात आता यश येत नसल्यानेच आता आरक्षणवादी आणि आरक्षण विरोधी गटात सरकार दंगल घडवण्याचा प्रयत्न सरकारकडून येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट असल्याची आवई उठवली जात आहे. मोदी सद्या ७ प्लस झोन सिक्योरिटी मध्ये आहेत. आता त्यांची सिक्युरिटी १४ झोनची करा अशी मागणी करत आरक्षण विरोधी शक्तींना सरकार खुले आम मदत करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. अराजक माजवण्याच्या दृष्टीने पुण्याच्या घटनेचा वापर होतोय, दंगल पसरली की, अंतर्गत आणीबाणी लावून आगामी निवडणूक पुढे ढकलण्याचा डाव सरकारचा असल्याचा आरोपही त्यांनी केला.