उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पंजाब गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची रविवारी चिंतन बैठक होणार आहे. या बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी हे राजीनामा देण्यार असल्याची माहिती काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत झाली. त्यामुळे या प्रकरणी काँग्रेसनेच पुढाकार घेत यासंदर्भात खुलासा करत हे वृत्त खोडसाळ आणि भाजपाच्या चर्चेवर आधारीत असल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे जी-२३ गटाने देखील पक्षाच्या पराभवावर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेतली आहे. या पार्श्वभूमीवर हे वृत्त पुढे आल्याने यावर वेगवेगळे तर्क-वितर्क लढविले जात आहेत. पाच राज्यांमध्ये झालेल्या पराभवानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पक्षातील पदाचा राजीनामा देणार असल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीवर झळकले. त्यानंतर यावर जोरदार चर्चा सुरू झाली. हा सगळा प्रकार व्हायरल झाल्यानंतर खुद्द काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर खुलासा करणारे स्पष्टीकरण दिले.
रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात खुलासा केला आहे. वृत्तवाहिनीवर काँग्रेसमधील कथित राजीनाम्यांबाबत आलेले वृत्त हे पूर्णपणे चुकीचं, खोडसाळ आणि अन्यायकारक आहे. एका वृत्तवाहिनीने अशा प्रकारचा प्रोपोगंडा पसरवणारे वृत्त दाखवणे हे चुकीचे आहे. सत्ताधारी भाजपामुळे व्हायरल करण्यात आलेल्या चर्चेवर विसंबून हे वृत्त दाखवण्यात आल्याचे ट्वीट रणदीप सुरजेवाला यांनी केले.
सुरजेवाला यांचे ट्वीट तुफान व्हायरल झाले असून त्यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये सात टप्प्यांत झालेल्या मतदानाचे निकाल १० मार्च रोजी लागले. यात उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या तीन राज्यांमध्ये भाजपाने एकहाती सत्ता मिळवली. गोव्यामध्ये भाजपाने अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांना धोबीपछाड देत आपने बाजी मारली.
मात्र काँग्रेसला मागील ७ वर्षापासून सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागत असून हातात असलेली राज्येही गमावावी लागत आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्येच पक्षांच्या नेतृत्वाविषयी अविश्वासाचे वातावरण निर्माण होत आहेत.
The news story of alleged resignations being carried on NDTV based on unnamed sources is completely unfair, mischievous and incorrect.
It is unfair for a TV channel to carry such unsubstantiated propaganda stories emanating from imaginary sources at the instance of ruling BJP.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 12, 2022