शिंदे-फडणवीस सरकारमधील कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांसह राज्यभरातून यासंदर्भात प्रतिक्रिया उमटली. त्याचबरोबर भाजपाने याप्रश्नी नापसंती दर्शविली. या सगळ्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी यावर ट्विटद्वारे भाष्य करत सगळेच तारत्मय पाळतात असे नाही असे सांगत आता या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया व्यक्त झाल्याने आता याच्या खोलात अधिक जाण्याची गरज नसल्याचे सांगत या वादावर पडदा टाकला.
माझ्या संदर्भात सत्ताधारी पक्षाच्या एका व्यक्तीने जे गलिच्छ विधान केले त्याची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रतिक्रिया उमटली यात काही आश्चर्य नाही. याप्रकारच्या भूमिकेचे समर्थन होत नसलं तरी याची जाण सगळ्यांनाच असते असे नाही.
— Supriya Sule (@supriya_sule) November 8, 2022
सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना म्हणाल्या की, सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्यांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नसतात. तसेच, महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं.
महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले, याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात, असं त्या म्हणाल्या.
आता याच्या खोलात जायची आवश्यकता नाही. जे काही घडलं ते महाराष्ट्राला अजिबात पसंत नव्हतं. हे ठिकठिकाणच्या प्रतिक्रियांमधून स्पष्ट झालेलं दिसतं.
— Supriya Sule (@supriya_sule) November 8, 2022
सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. पण जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या, ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे, असा सत्तार यांना टोला लगावत सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
महिलांचाच सन्मान जपण्याची महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही सुप्रिया सुळेंनी केलं आहे. मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया असेही त्या म्हणाल्या.
माझे सर्वांना असे विनम्र आवाहन आहे की आपण सर्वजण आता याविषयी जास्त प्रतिक्रिया देऊ नये. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!
— Supriya Sule (@supriya_sule) November 8, 2022
राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून हा ‘सुसंस्कृत महाराष्ट्र’आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. धन्यवाद. जय हिंद-जय महाराष्ट्र!” असे त्या शेवटी म्हणाल्या.