शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणावर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना रिक्षाच्या वेगाने मर्सिडीजला मागे टाकले असा खोचक टोला लगावला होता. या टीकेबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून द्यायचं आणि ट्वीट करायचं. स्व:तच्या हातानं ट्वीट करता येतं का? याचा अभ्यास करावा लागेल असा खोचक टोला लगावला.
खासदार विनायक राऊत हे रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी वरील टोला लगावला.
त्यानंतर पुढे बोलताना म्हणाले की, मी मध्यस्थी केल्यानेच बाळासाहेबांनी एकनाथ शिंदे यांना विधानसभेची उमेदवारी दिली होती. पण मला आज त्याचा पश्चाताप होत आहे. माझ्या हातून आयुष्यातील मोठं पाप झालं आहे. मी शिफारस केली नसती तर आमदारकी मिळाली असती का? हे त्यांनी आई-वडिलांची शपथ घेऊन सांगावं असं आव्हानही एकनाथ शिंदे यांना दिले.
संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार होती तर तुम्ही बैठकीत, चर्चेत हा मुद्दा मांडायला हवा होता. आता केलेल्या गद्दारीचं खापर शंभूराजे देसाई संजय राऊत यांच्यावर फोडत आहेत. उद्धव ठाकरे तुम्हाला सतत आवाहन करत असताना तुम्ही परत का आला नाहीत?, असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी शेवटच्या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांची नावं बदलली हे हिंदुत्वाचं प्रतिक नाही का? अशी विचारणाही बंडखोरांना केली.
आता आपलं पाप झाकण्यासाठी उद्धव ठाकरेंवर आरोप केले जात आहेत. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा कुटील डाव ४० अलिबाबा चोरांच्या माध्यमातून भाजपा खेळत असेल, तर अलिबाबाची गुहा पोखरुन शिवसैनिक भगवा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
धनुष्यबाण गुलाबराव यांच्या बापजादाने निर्माण केलेलं नाही. आमच्या बापाने केलं आहे, ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे. हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. तुम्हाला नैतिक अधिकार नाही. हिंमत असेल तर आम्ही शिवसेना सोडली जाहीर करा असे आव्हानही त्यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांना दिले.
शिंदे गटाकडून शिवसेनेतील आमदार, खासदार संपर्क असल्याच्या दाव्यावर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मी आमदार, खासदार कोणावरही जबरदस्ती करणार नाही सांगितलं आहे. मनापासून आहेत त्यांनीच सोबत राहा, चुकत असेल किंवा दुसरीकडे उज्वल भविष्य आहे असं वाटत असेल तर जरुरा जा असं ते म्हणाल आहेत. इतक्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लाभल्याचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले.