काही जण सारखं म्हणत होते मी परत येतो परत येतो. पण मी कसा येवू देईन असा, सगळा बंदोबस्त केला असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा उत्तर कारभार सुरु असल्याचे प्रशस्ती पत्रकही देवून टाकले.
उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी पुन्हा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर टीका करताना म्हणाले की, कधीकधी पदावर बसलेल्या लोकांना सुद्धा पद आणि अधिकार यांचं तारतम्य राहात नाही. महाराष्ट्रात कुणीतरी भाषण केलं की छत्रपती मोठे नव्हतेच, कुणीतरी दुसऱ्यांनीच त्यांना मोठं केलं. त्यांनी सावित्रतीबाई फुलेंबद्दलही भाषण केलं. लोक म्हणाले आता काय करायचं? म्हटलं सोडून द्या ना. काय कुणी विचारणार नाहीये. नको ते बोलल्यानंतर लोक म्हणतात उगीच याच्या नादी लागायला नको. यात काही दम नाही. यात काही अर्थ नाही. याच्याकडून नीट काही बोललं जाणार नाही. म्हणून त्याचा विचार करण्याचे कारण नसल्याची उपरोधिक टीकाही त्यांनी यावेळी राज्यपालांवर केली.
विशेष म्हणजे शरद पवार यांनी शनिवारी प्रतिक्रिया व्यक्त करतानाही राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका करता म्हणाल की, हल्लीच्या राज्यपालांवर भाष्य न केलेले बरे. केंद्र सरकार घसरून कोणत्या पातळीवर जात आहे याचे उदाहरण महाराष्ट्राला पहायला मिळत आहे. ज्या पदाची प्रतिष्ठा महाराष्ट्रात सांभाळली ती आम्ही ठेवणारच नाही हा निर्धार ठेवून कोणी काम करत असेल तर त्यावर भाष्य न केलेले बरे अशी खरपूस टीका राज्यपालावर केली.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे येथील पुणे मेट्रो लोकार्पण कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांकडे करत म्हणाले की, पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. मनात कुणाच्याही बद्दल असूया न ठेवता विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो असे स्पष्ट केले.