MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी जोरदार इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला.
MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थी आमरण उपोषणास बसले आहेत त्यांची जयंत पाटील यांनी सोमवारी भेट घेतली.
जयंत पाटील म्हणाले हा विषय अतिशय गंभीर असून दिवसरात्र अभ्यास करून मुले परीक्षेची तयारी करत आहेत. अचानक अभ्यासक्रमात होणारा बदल हा त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, एमपीएससीच्या परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम बदलेल्या पॅटर्न हा २०२३ साला ऐवजी २०२५ या सालापासून लागू करण्याच्या मागणी प्रश्नी मागील दोन वर्षापासून सातत्याने आंदोलन करत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय घेतला. तसेच याबाबतचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनंती पत्र महाराष्ट्र राज्यसेवा आयोग अर्थात एमपीएससीला पाठविले. मात्र त्याबाबतचा अधिकृत निर्णय अद्याप एमपीएससीकडून निर्णय जाहिर करण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा या परिक्षार्थी विद्यार्थींनी याबाबतचा शासन निर्णय जारी करावा या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरु केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत त्यांच्या भावना जाणून घेतल्या.