काही वर्षापूर्वी देशात कांदा आणि लसणाचे दर चांगलेच वाढले. त्यावर या वाढत्या वस्तूंच्या दरावर नियंत्रण आणण्याच्या अनुषंगाने केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी अजब तर्कट मांडत मी कांदा-लसून खात नाही. त्यामुळे मला त्याच्या किंमती माहित नाहीत असे उद्धट उत्तर दिले. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून संपूर्ण देशभरात टोमॅटोचे दर वाढत असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही योजना जाहिर केली नाही. यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील महिला मंत्री प्रतिभा शुक्ला यांनी परत एकदा अजब तर्कट मांडत टोमॅटो कुंडीत लावा, आणि सगळ्याचं वस्तू महाग आहेत तर खायचं सोडून द्या, त्या सर्व वस्तू आपोआप स्वस्त होईल असा सल्लाही नागरिकांना दिला.
प्रतिभा शुक्ला म्हणाल्या, पहिली गोष्ट म्हणजे टोमॅटो कुंडीत लावा. सर्व वस्तू महाग आहेत, तर खाणं सोडून द्या. त्या वस्तू आपोआप स्वस्त होतील.
मंत्री शुक्ला पुढे असंही म्हणाल्या, आमच्याकडे एका गावात एक पोषण बाग बनवली आहे. त्या गावातील सर्व महिला गावातील एका भागात कचरा एकत्र करतात. तेथे या महिलांनी भाजीपाला उत्पादन केलं आहे. त्यामुळे आता त्यांना भाजीपाला घेण्यासाठी बाजारात जावं लागत नाही. त्या पोषण बागेत टोमॅटोचंही उत्पादन घेतलं जाऊ शकतं असे स्पष्ट केले.
पुढे बोलताना प्रतिभा शुक्ला म्हणाल्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं. महागाई नवी नाही. दरवर्षी या काळात टोमॅटो महाग होतात, असं म्हणत त्यांनी टोमॅटो दरवाढीवरून टीका करणाऱ्यांना निरूत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.