पुन्हां पुन्हां लाईट जाणं आणि अंगाला दरदरून घाम फुटणं आता अंगवळणीच पडू लागलंय. जगाशी घेणंदेणं नाही असं स्वतःला समजावून खोट्याने पुन्हां त्याच जगाच्या अंगणात हातपाय पसरून सल्ले देणं आता कमी केलं पाहिजे. म्हणून आता अंगणात ही जावेना. खूपदा लाईट जाते येते. त्यामुळे टिव्हीवरचं जग मोठ्या गॅप नंतर बांधणं कठीण होऊन जातं. त्यामुळे आता खूप दिवासानंतर लाईट येईल आणि टिव्हीवरचं चित्र माझ्या डोळ्यासमोर येतं तेंव्हा त्यातला नीचपणा, अजुन ही लुच्चेगिरी संपली नाही? असा डोक्यात सणकून वारा जाणारा प्रश्न उभा राहतो. पण या लुच्चेगिरीचा बळी मी का जावा? मला माझ्या विचारांच्या वेगळ्या कक्षा सध्यस्थितीत उंचावायच्या असतील तर या लुच्चेगिरीत मला वाहवत तर जावं लागणार नाही ना? काहीतरी सुचण्याचं माध्यम डायरेक्ट आभाळातून पडत नाहीत आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतं आणि तुम्हाला त्यातून खटकणाऱ्या गोष्टी निवडाव्या लागतात आणि मग विचार करून लिहावं लागतं.
हल्लीचा थिल्लरपणा पाहता डोळ्याची झापडं बंदच ठेवलेली बरी. आणि जेंव्हा जेंव्हा तुमची तुम्हाला विचार करायला लावणारी सगळी माध्यम थिल्लरपणाचा नंगानाच मेंदू हलवून टाकतात तेंव्हा, कंगना, रिया, सुशांत यांच्या सोबत निवांत मेंदू हलका करण्यासाठी गांजा ड्रग्स ओढत नव्या कंटेन्डची स्क्रिप्ट लिहीत नव्या नव्या कल्पना त्यांच्याकडूनच घेतो. हा गांजा अख्या जगभर कोणी पसरवला माहिती नाही. टीव्ही चॅनलवाल्यांपासून ते अगधी प्रधानमंत्र्यापर्यंत. टीव्ही वाले खूप बोलतात आणि प्रधानमंत्री मुळ मुद्दे सोडून काहीही बोलतात. आणि मी कशावर ही लिहायला जातो, पण लिहीनच होत नाही. कोणी कोणाच्या आसपास नाही नशेचा इतका फरक का? हे षडयंत्र कोणाचं आहे ? याचा तपास कोणाकडेही करायला द्यायला माझी तरी हरकत नाही. मी सतत अदृश्य झालेल्या सूर्याला जेंव्हा पाहायला अंगणात येतो तेंव्हा तेंव्हा मला सूर्य दिसत नाही. हल्ली मला तो रात्रीतरी दिसेल का? या थिल्लरपणाच्या पलीकडे जाऊन मुतता मुतता विचार करतो. आता आपण आपलें डोळे उघडे ठेवले पाहिजेत आणि करकचून थिल्लरपणाचा मांडलेला बाजार थरथरत्या हातानी ओरबाडून लिहिला पाहिजे. पण एकदा का घंटा वाजवली की तिर्थ घेतल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही असं काहीस माझं झालंय. लोकांनी हा समाज माध्यमांचा थिल्लरपणा पाहणं सोडू नये. कारण जोपर्यंत तुम्हाला तो थिल्लरपणा वाटतं नाही तोपर्यंत तुम्ही मुळ प्रश्नांकडे मूळ मुद्यांकडे वळणार नाहीत. म्हणून मीही ठरवलंय कितीही त्रास झाला तरी जोपर्यंत चालेल तोपर्यंत हा थिल्लरपणा आवर्जून पाहायचा. लोकांना उपदेश द्यायचा नाही महिन्या महिन्याला टीव्हीचा रिचार्ज भरून मोबाईल मधला डेटा फुल्ल करून हा नंगानाच पाहत राहायचा जोपर्यंत आपल्या घाण झालेल्या मेंदूची नस फाटत नाही. आणि नेमकं काय पाहावं याची ज्ञानप्राप्ती होतं नाही. ज्यांना ज्यांना झाली आहे, त्यांनी तरी सुरुवात करावी.