मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात मागील काही महिन्यापूर्वी लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे देशातील अर्थव्यवस्थेचं चक्र थांबल होत. मात्र आता देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून अर्थव्यवस्थेलाही पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, करोना महामारीचा फटका बसलेल्या अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी कोणतीही पावलं उचलण्यास रिझर्व्ह बँक तयार असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगत अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांनीही योगदान द्यावं लागणार असल्याचे मत त्यांनी मांडले.
उद्योग जगतातीली संघटना असलेल्या फिक्कीनं आज आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात ते ऑनलाईन सहभागी झाले होते.
जीडीपीच्या आकडेवारीवरून करोनाचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला याचे संकेत मिळत आहे. करोनानंतर आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रांना रिसर्च आणि इनोव्हेशन, अन्न प्रक्रिया आणि पर्यटन क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावण्याची आवश्यकता आहे. पर्यटन क्षेत्रात अनेक व्यापक संधी उपलब्ध आहेत आणि खासगी क्षेत्रांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी त्यांनी देशातील नव्या शैक्षणिक धोरणावरही भाष्य केलं. शिक्षण कायमच आर्थिक विकासात आपलं योगदान देतं. त्यामुळे नवं शैक्षणिक धोरण हे ऐतिहासिक आहे आणि नव्या सुधारणांसाठी ते आवश्यकही आहे. पर्यटन क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्था वाढीचं इंजिन ठरू शकतं. येणाऱ्या काळात याच्या मागणीत वाढ होण्य़ाची शक्यता आहे. अशातच या क्षेत्राला कॅपिटलाईझ करण्याची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त लोन रिस्टक्चरिंग स्किम तयार करताना लोकांच्या हितांचं आणि त्यांच्या आर्थिक स्थिरतेचा विचार होणं महत्त्वाचं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कृषी, उत्पादन या क्षेत्रांमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि पुढील काळात ती वेगानंही वाढेल. याव्यकतिरिक्त बेरोजगारीही हळूहळू कमी होण्याची शक्यता असून काही क्षेत्रात ती त्या घटही झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.