मराठी ई-बातम्या टीम
केवळ स्वातंत्ऱ्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगानी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत नाशिक येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनावर टीका केली.
नाशिक ही स्वातंत्ऱ्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमीसुध्दा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुध्दा भूषविलेले असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव ! या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले याचे स्वागतच असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पण केवळ स्वातंत्ऱ्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनीयांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान, स्वातंत्ऱ्यवीर सावरकर यांचे व्यक्तीमत्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी संमेलनाला माझ्या शुभेच्छा आहेतच. पण…जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल. तर तेथे जावून काय करायचे असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.
तसेच मी काही साहित्यिक नाही. त्यामुळे मी जावूनही काही फरक पडणार नसल्याचे वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा स्वा.सावरकर यांच्या मुद्यावरून राज्यातील वातावरण तापविण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसून येत आहे. तसेच या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ हे असून त्यांच्यावर राजकिय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
त्याचबरोबर स्वा.सावरकरविषयी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सावरकरांच्या खऱ्या विचारांचे पाईक आम्हीच असल्याचे सांगत मग केंद्रात तुमची सत्ता असताना स्वा.सावरकरांना भारतरत्न का देत नाही असा खोचक सवाल भाजपाला केला.