Breaking News

…आणि औरंगाबादचे आता “संभाजीनगर” शासकिय नामांतर झाले ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनीच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला

औरंगाबाद : प्रतिनिधी

काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा मुद्दा उपस्थित होत भाजपा आणि शिवसेनेकडून एकमेकांच्या विरोधात औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याच्या राजकिय कुरघोड्यांना ऊत येत भाजपानेही संभाजीनगर नामांतर कधी करणार असा सवाल करत शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच औरंगाबादाचा उल्लेख संभाजीनगर करत अनौपचारीक नामांतर केल्याचे जाहिर केले.

औरंगाबादचे नामांतर करण्याची घोषणा शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. त्यावेळी शिवसेना-भाजपा सरकारच्या काळआपासून शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच करण्यात येत आहे. गतवेळच्या भाजपाच्या नेतृत्वाखालील फडणवीस सरकारमध्ये शिवसेनाही सहभागी होती. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यांनी कधीच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला नाही. परंतु मराठवाडा स्वातंत्र्यदिनानिमित्त  आज शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा आज अधिकृत शासकिय दौरा औरंगाबादचा होता.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याबाबतचा प्रस्ताव औरंगाबाद महापालिकेनेही यापूर्वीच फडणवीस सरकारच्या काळात राज्य सरकारला पाठविला आहे. मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. यापार्श्वभूमीवर या दौऱ्यात ते औरंगाबादचा उल्लेख नेमका काय करणार याबाबतची उत्सुकता शिवसेनेसह औरंगाबाद वासियांना होती. परंतु मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या शासकिय कार्यक्रमात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा जवळपास तीनहून अधिकवेळा करत औरंगाबादचे नामांतर करण्यात आल्याचे एकप्रकारे जाहीर झाले. जरी औरंगाबादचे नामांतर कागदोपत्री संभाजीनगर असे झालेले नसले तरी सार्वजनिकरित्या संभाजीनगर झाल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीच एक प्रकारे जाहिर केले. तसेच औरंगाबाद अहमदनगर विमानसेवाचा उल्लेख ही त्यांनी संभाजीनगर अहमदनगर सेवा असाच उल्लेख केला.

त्यामुळे आता औरंगाबादचे नामांतर कागदोपत्री संभाजीनगर कधी व्हायचाय तेव्हा होवो मात्र मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केल्याने औरंगाबादचे संभाजीनगर या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची प्रतिक्रिया स्थानिक शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमातच औरंगाबादचा उल्लेख ज्या पध्दतीने संभाजीनगर असा केला त्याचवेळी आता शासकिय आणि सार्वजनिक पातळीवर औरंगाबाद हे आता संभाजीनगर झाल्याचे मत दुसऱ्या एका शिवसैनिकाने व्यक्त केले.

दरम्यान, औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्यास एमआयएम, काँग्रेस यांचा विरोध असून राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र याबाबत अद्याप कोणतीही भूमिका ठरलेली नाही. मात्र मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शासकिय कार्यक्रमात औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करूनही अद्याप या कोणत्याच राजकिय पक्षांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही हे विशेष. मात्र जेव्हा औरंगाबाद महापालिकेची निवडणूक जाहिर होईल त्यावेळी हा विषय पुन्हा एकदा राजकिय मुद्दा म्हणून चर्चेत आला नाही म्हणजे झाले.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *