मुंबई : विशेष प्रतिनिधी
राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सर्वात आधी आपला पुतण्या अजित पवार यांना राजकारणात आणले. त्यानंतर मुलगी सुप्रिया सुळे-पवार यांना आणले. तसेच काही महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणूकीत दुसरा पुतण्या रोहित पवार यास राजकारणात आणताना पवार घराण्यात खळखळ किंवा वाद झाल्याचे ऐकिवात नाहीत. मात्र गेल्या लोकसभा निवडणूकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र तथा शरद पवारांचे नातू पार्थ पवार यांना उमेदवारी देताना शरद पवारांनी पहिल्यांदा जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर दुसऱ्यांदा आज पुन्हा एकदा जाहीरपणे तो इमॅच्युअर असल्याची टिपण्णी करत त्याचे बोलण्याला कवडीची किंमत देत नसल्याचे सांगत पार्थ पवार यांना नगण्य मानत असल्याचे जाहीर संकेत दिल्याने नातू पार्थ वर शरद पवार का? चिडतात असा प्रश्न राजकिय वर्तुळात चर्चेला जात आहे.
राज्याच्या राजकारणात विशेषत: पवार कुटुंबियांमध्ये शरद पवार यांच्या मताला किंमत आहे. त्यामुळे जे घरातील व्यक्तींना सांगितले जाते तेच सगळेजण करतात. लोकसभा निवडणूकीच्यावेळी सुप्रिया सुळे यांना बारामती येथून उमेदवारी जाहीर केल्यानंतर स्वत: माढा लोकसभा मतदारसंघातून निव़डणूक लढविणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. दरम्यान मावळ लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्याकडून त्यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरण्यात आला. याप्रश्नी त्यांनी आधी पक्षाच्या बैठकीत निर्णय घेण्याचा प्रयत्न केला. परंतु पक्ष आणि घरच्या पातळीवर हा प्रश्न सुटल्याने पार्थच्या उमेदवारीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच एकाच घरात किती उमेदवारी द्यायची असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी सबंध प्रचारात शरद पवारांनी फक्त एकदाच सभा प्रचार सभा घेतली. दुसऱ्याबाजूला अजित पवार यांनी मावळमध्ये आपली सगळी ताकद पणाला लावली. परंतु पार्थ पवारांचा पराभव झाला.
पवार घराण्यातील आणखी एक वारसदार रोहित पवार यांना व्यवस्थित अहमदनगरमधील कर्जत-जामखेड या विधानसभा मतदारसंघात उतरवून त्यांना विजयीही केले. मात्र त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापासून ते निवडणूक जिंकेपर्यत त्यांनी कधीच एखादे वक्तव्य किंवा पक्षाच्या विरोधी कृती केल्याचे आतापर्यत दिसून आले नाही.
याउलट शरद पवारांच्या पार्थ पवारांची उमेदवारी मनाच्या विरूध्द जाहीर होणे. त्यानंतर राज्यात सत्ता आल्यानंतर बॉलिवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणे, राम मंदीर प्रश्नी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर पार्थ याने पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांचे आभार मानने किंवा त्यांना धन्यवाद मानने यागोष्टीमुळे पवार कुटुंबियांमध्ये वैचारीक आणि राजकिय दरी वाढत चालल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पार्थच्या या अशा वागण्यानेच ते पार्थला फटकारत असल्याची चर्चाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु आहे.
अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्येही एक छुपा संघर्ष आधीच सुरु झाल्याने पार्थबाबतच्या वक्तव्यानंतर अजित पवार काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.