मुंबईः प्रतिनिधी
१ मे दिनाचे औचित्य साधत नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीतील जांभूरखेडा घडवून आणण्यात आलेल्या भूसुरूंग स्फोटात दुर्दैवीरित्या १५ पोलिस आणि खाजगी वाहनाचा चालक यांचा अंत झाला. या घटनेचा आढावा घेण्यासाठी आजच गडचिरोलीला जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
गडचिरोलीतील या घटनेत शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणावर नुकसान भरपाई देण्याचा विचार राज्य सरकार करत असून सध्या मिळत असलेल्या नुकसान भरपाईच्या रकमेपेक्षा वाढीव रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती गृह विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने देशाच्या राजकारणातील अनेक बड्या राजकीय नेत्यांची वर्दळ राज्यात सुरू होती. यातील एका नेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने नक्षवाद्यांनी भूसुरुंग पेरले होते. मात्र भूसुरूंग पेरलेल्या रस्त्याने नेमके क्युआरटीचे जवान जात असताना नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटानंतर नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील अनेक भागात पोस्टर्स लावत गडचिरोलीत पूल, रस्ते न बांधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.