Breaking News

नवाब मलिकांकडून आर्यन खानप्रकरणातील चॅट आणि कॉल केले उघडः समीर वानखेडे उत्तर द्या क्रुझवर कुणाला चिन्हीत करायचं याबाबतचे केपी गोसावीचे व्हॉटस्ॲप चॅट नवाब मलिक यांनी ट्वीटरवर केले शेअर

मुंबई: प्रतिनिधी
केपी गोसावी आणि दिल्लीतील खबरी यांच्यात क्रुझवर कुणाला चिन्हित करायचे याबाबतचे दोघांमधील व्हॉटस्ॲप चॅट ट्वीटरवर शेअर करुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली.
क्रुझवर काशिफ खान चिन्हीत असताना त्याला का अटक करण्यात आली नाही शिवाय त्याच्यासोबत असणारा व्हाईट दुबे यालाही वगळण्यात का आले याचं उत्तर एनसीबीच्या समीर दाऊद वानखेडे याने द्यावे अशी मागणीही त्यांनी आज केली.
दरम्यान काशिफ खान व समीर दाऊद वानखेडे यांचे काय संबंध आहेत याची माहितीही एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी द्यावी असेही त्यांनी सांगितले.
या व्हॉटस्ॲप चॅटमध्ये केपी गोसावीला खबरी काशिफ खान व व्हाईट दुबे यांची माहिती देत आहे. तर केपी गोसावी त्याला फोटो पाठवायला सांगत असून त्या खबरीने काशिफ खानचा फोटोही शेअर केला आहे. ज्या पध्दतीने फोटोच्या आधारावर लोकांना चिन्हीत करण्यात आले त्याचपध्दतीने काशिफ खान याला का चिन्हीत करण्यात आले नाही. तो दोन दिवस क्रुझवर असताना त्याला का वगळण्यात आले असा सवालही त्यांनी केला.
समीर दाऊद वानखेडे हा झोनल अधिकारी आहे आणि त्याच्या अखत्यारीत गोवा राज्य येते. जगभरातील लोकांना माहीत आहे की गोव्यात ड्रग्ज टुरीझम चालते. रशियन माफिया ड्रग्जचा धंदा करत आहेत. मात्र गोव्यात कारवाई होत नाही कारण काशिफ खानच्या माध्यमातून ड्रग्जचे रॅकेट चालते आणि समीर दाऊद वानखेडे व काशिफ खान यांचे घनिष्ट संबंध आहेत असा थेट आरोपही त्यांनी पुन्हा केला.
क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात चिन्हीत काशिफ खान याला चौकशीला का बोलावण्यात आले नाही. व्हाईट दुबे हा सुद्धा होता त्याचीही माहिती देण्यात आली होती. मग त्याला का अटक नाही याचा जाबही एनसीबीच्या वरीष्ठ अधिकार्‍यांना विचारला.
काशिफ खानवर देशभरात वेगवेगळे गुन्हे आहेत. चारच दिवसापूर्वी मुंबईत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. एका कोर्टाने तर त्याला फरार घोषित केले आहे इतकं असताना काशिफ खानला का वाचवण्यात येत आहे याचं उत्तर एनसीबीने द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *