मुंबई: प्रतिनिधी
ऑनलाईन परिक्षा देवूनही काही तांत्रिक कारणामुळे गैरहजर असल्याची नोंद गुणपत्रिकेवर नापास ठरलेल्या त्या ३४ विद्यार्थ्यांची जबाबदारी महाविद्यालयाने स्विकारली आहे. यासंदर्भात लवकरच तक्रारदार विद्यार्थ्यांची सर्व माहिती मुंबई विद्यापीठाला कळविण्यात येणार असल्याचे सिध्दार्थ महाविद्यालयाचे अॅड.पंकज मेढे यांनी मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाच्या प्रतिनिधीला फोनवरून दिली.
मुंबई विद्यापीठाकडून एलएलबीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन परिक्षा घेण्यात आली. मात्र परिक्षा दिलेल्या एकूण विद्यार्थ्यांपैकी ३४ विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविण्यात आल्याने त्यांचे वय वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली. त्यापार्श्वभूमीवर २५ फेब्रुवारी २०२१ रोजी मराठी ई-बातम्या.कॉम संकेतस्थळाने वृत्त प्रकाशित करत यास वाचा फोडली. त्यावर सिध्दार्थ महाविद्यालयाने या वृत्ताची दखल घेत वरील खुलासा केला.
ऑनलाईन परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिका काही तांत्रिक कारणास्तव विद्यार्थ्यांकडून सबमिट झाल्या नसल्याची बाब पहिल्यांदा विद्यापीठाच्या निकालानंतर महाविद्यालय प्रशासनाच्या लक्षात आली. तसेच यासंदर्भात अनेक विद्यार्थ्यांनीही ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर तात्काळ महाविद्यालयाकडून अशा नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी एकत्रित करण्यासाठी ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानुसार आतापर्यंत ३४ विद्यार्थ्यांनी त्यावर तक्रार दाखल केली आहे. आणखी काही विद्यार्थ्यांना अशाच पध्दतीने नापास व्हावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसात हि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाशी पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हि बाब पहिल्यांदा निदर्शनास आल्यानंतर लगेच मुंबई विद्यापीठाशी आम्ही चर्चा केली होती. त्यानुसार एकदा गैरहजर असा शेरा येवून नापास झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती पूर्ण जमा झाल्यानंतर पुढील पत्रव्यवहार विद्यापीठाशी करणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.