मुंबई: प्रतिनिधी
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटी रूपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याच्या आरोपावरून सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात धाव घेतलेले आयपीएस अधिकारी तथा होमगार्डचे पोलिस महासंचालक परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हे दाखल होवू लागल्याने त्यांनी आता पुन्हा राज्य सरकारच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र यावेळी त्यांनी थेट राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनाच संशयाच्या भोवऱ्यात आणत आपल्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप याचिकेच्या माध्यमातून केला. यावर ४ मे २०२१ रोजी उच्च न्यायालयात याचिकेवर सुणावनी होणार आहे.
परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचारी मार्गातून मोठ्याप्रमाणात पैसा कमविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी करण्यास राज्य सरकारने परमबीर सिंग यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले. तसेच परमबीर सिंग यांच्यासह २७ पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात अकोला येथे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवित भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान १९ एप्रिल रोजी परमबीर सिंग हे पोलिस महासंचालक संजय पांडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या कार्यालयात गेले असता कार्यालयात झालेल्या बैठकी दरम्यान महासंचालकांनी आपल्यावर न्यायालयातील देशमुख यांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपल्यावर दबाव आणल्याचा आरोप करत यासंदर्भात परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी तुम्ही केलेल्या तक्रारी मागे घ्या. अन्यथा तुमच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे, असं मला सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी सिंग यांनी याचिकेत केली आहे. सिंग यांनी आता राज्य सरकारवर नवा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या याचिकेवर येत्या ४ मे रोजी सुनावणी होणार आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय चालवतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुतंवण्यात आले आहेत, असा आरोप भीमराज घाडगे यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबियांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याच्या पोलीस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी केला आहे.
वाचा नेमके काय आरोप घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्या विरोधात केलेत..सोबत तक्रार अर्ज