मागील काही दिवसांपासून शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर सायन येथील काही कार्यकर्त्यांनी मातोश्री येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. त्यावेळी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपा आणि मिंदे गटाने रोज माझ्याकडील निष्क्रीय शिवसैनिकाला प्रत्येक आठवड्याला फोडून घेवून जावे. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक पुन्हा पेटून उठतो. त्यामुळे भाजपा आणि मिंदे गट जे काम करत आहे त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. बर इतके होऊनही शिवसेना कशी संपलेली नाही, कशी संपत नाही हा त्यांना प्रश्न सतावत आहे. त्यांच्या या कृतीमुळे शिसेना पुन्हा जोमाने उभी रहात आहे असल्याचे सांगितले.
ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रमोद शेंडे यांच्या नेतृत्वात सायन कोळीवाडा येथील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना भेटायला आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी करत या शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य फुंकण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच दिल्लीत झालेल्या भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीसंदर्भात खोचक टिप्पणी केली. आता पाच वर्षानंतर एनडीए नावाचा अमिबा जिवंत आहे, हे कळाल्याची खोचक टीका केली.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी लवकरच तुम्हाला मुंबई आणि राज्यभरात कार्यक्रम देणार आहे, तो नीट पार पाडा, असे सांगत कोणी गेल्यानंतर आपल्या सागराला उधाण येते, त्वेष, राग आणि जिंकण्याची इर्षा आणखी वाढते. जे गेलेत त्यांना जय महाराष्ट्र. आता त्यांचा आणि आपला संबंध तुटला. मला फक्त एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी तिकडे जाऊन पक्षाशी गद्दारी करु नये. त्यांनी पक्षविरोधी काम केल्यास आपल्याला शिवसैनिक काय असतो, हे त्यांना दाखवून द्यावं लागेल. आपले बालेकिल्ले शाबूत राखण्यसाठी तुम्ही समर्थ आहात. भाजपा आणि मिंदे गटाच्या प्रत्येक कार्यक्रमात माझ्यावर टीका केली जाते. इतके प्रयत्न करुनही शिवसेना अजून संपत का नाही, हा प्रश्न त्यांना पडला आहे. एकदा निवडणुका होऊनच जाऊ दे. सरकारने निवडणुका घ्याव्यात, असे आव्हानही दिले.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, मला एका गोष्टीचा अभिमान आहे. २००७ च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळीही असेच वातावरण तयार झाले होते. आता शिवसेनेचं काय होणार , मुंबई महानगरपालिकेवरीच सत्ता जाणार, अशी चर्चा तेव्हा होती. पण शिवसैनिकांच्या मेहनतीमुळे आपण विजय मिळवला. आता देखील शिवसेना दिवसागणिक जोमाने वाढत आहे. त्यावेळी आपण मुंबई महापालिकेवर विजय मिळविल्यानंतर काही महिला त्यावेळी होत्या, त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रु होते. त्या अश्रुची किंमत जो जाणतो तो खरा निष्ठावान असे ठाकरे म्हणाले.
सायन येथील शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली. 'आम्ही तुमच्यासोबत लढायला तयार आहोत' असा पाठिंबा महाराष्ट्रातील प्रत्येक कट्टर शिवसैनिक देत आहे. त्यामुळे संघटनेला मजबूती मिळत आहे. pic.twitter.com/4BKU0Vnswx
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 29, 2023