मुंबईः प्रतिनिधी
सध्या राज्यभर कोरोना विषाणूने थैमान घातलेले असून मुंबई / ठाणे विभागात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना दुसऱ्याबाजूला मात्र अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून बोगस शिधा पत्रकधारकांना शोधण्यासाठी नव्याने नागरिकांकडून अर्ज भरून घेण्याचे आदेश दिले. परंतु केंद्र सरकारची वन नेशन वन कार्ड हे अभियान राबविले जात असताना आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अशा परिस्थितीत शिधा पत्रिकाधारकांचा शोध मोहिमेचा अट्टाहास का? असा सवाल शिधा वाटप कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामराजे भोसले यांनी केला.
कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे. अशा परिस्थितीत अन्न, नागरी पुरवठा विभागाअंतर्गत येणा-या नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांचे आस्थापनेवरील शिधावाटप कर्मचारी / अधिकारी हे बदलापूर, कल्याण, विरार, पनवेल अशा अनेक दूरवरच्या ठिकाणावरून दैनंदिन प्रवास करून अन्नधान्य पुरवठा करण्याचे सातत्याने काम केले आहे. सध्या मंत्रालय व इतर काही विभागात एक दिवसाआड काम करण्याचे आदेश पारित झालेले असताना यंत्रणेतील शिधावाटप अधिकारी, सहायक शिधावाटप अधिकारी, शिधावाटप निरीक्षक व कार्यालयीन कर्मचारी जनतेपर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे काम प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उपस्थित राहून पार पाडत आहेत. कोरोनामुळे एका शिधावाटप निरीक्षक यांचा मृत्यू झालेला आहे, तसेच काही दुकादारदेखील मृत्युमुखी पडले आहेत. तर अनेक कर्मचारी/अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. शिधावाटप यंत्रणेतील यांनी संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात काम करणारे कर्मचारी/अधिकारी अद्याप लसीकरणापासून देखील वंचित आहेत. कर्मचारी/अधिकारी यांना लस देण्याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत मंत्री छगन भुजबळ यांची संघटना भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई/ठाणे शिधावाटप यंत्रणेत सहायक नियंत्रक शिधावाटप यांची ७ पदे मंजूर असून गेल्या तीन वर्षापासून ७ ही पदे रिक्त आहेत, शिधावाटप अधिकारी हे कार्यालय प्रमुख पद असून मंजूर ६० पदांपैकी २७ पदे रिक्त आहेत. तर सहायक शिधावाटप अधिकारी यांची १६ पदे रिक्त आहेत. तसेच शिधावाटप यंत्रणेचा कणा समजल्या जाणाऱ्या शिधावाटप निरीक्षक यांची २५३ इतकी पदे रिक्त आहेत व इतर कर्मचारी यांची ४४८ पदे रिक्त आहेत संपूर्ण शिधावाटप यंत्रणेत १८९० पदांपैकी ७५१ एव्हढी पदे रिक्त आहेत. शासनाकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही अद्याप रिक्त पदेभरलेली नाहीत. कोरोनाची गंभीर परीस्थिती असताना अपात्र शिधापत्रिका शोध मोहीमेचा अट्टाहास का? असा सवाल संघटनेकडून उपस्थित केला जात आहे. प्रत्येक महिन्याला बायोमेट्रिक e pos मशीनद्वारे ओळख पटवून धान्य वितरीत केले जाते. अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेद्वारे नव्याने ओळख पटविण्याची गरज भासत नाही. जे शिधापत्रिकाधारक धान्य घेत नाहीत अशा शिधापत्रिका धारकांची कोरोनाच्या परिस्थितीत ओळख पटविण्याची आवश्यकता नाही. One Nation One Ration Card या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार शिधापत्रिकाधारक या योजनेस जोडलेल्या इतर कोणत्याही राज्यात धान्य घेऊ शकतात. परंतु जे शिधापत्रिकाधारक इतर राज्यात अथवा जिल्ह्यात E-POSमशीनद्वारे अंगुठा लावून धान्य घेतात ते शिपाधारकांना अर्ज भरून देण्यास अडचणी येतात व सदर अर्ज भरून न दिल्यामुळे शिधापत्रिका रद्द होणार व One Nation One Ration Card या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. सदर अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबविण्यात येऊ नये अशी मागणी संघटनेच्या वतीने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव यांच्याकडे केली.
Tags bogus ration card finding chhagan bhujbal one nation one ration card ramraje bhosale shidhawatap karmachari sanghatana
Check Also
उत्तर मध्य मुंबईतून भाजपाकडून अॅड उज्वल निकम यांना उमेदवारी
नुकतीच मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार तथा विद्यमान मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड …