राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित आघाडीचे प्रमुख अॅड प्रकाश आंबेडकर यांचे राजकिय वैर सर्वांना माहित आहे. मात्र आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मधील एका कार्यक्रमाचे निमित्त साधून प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांची मोठ्या वर्षाच्या अंतराने भेट झाली. मात्र या भेटीत महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे वंचित प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
शरद पवार प्रकाश आंबेडकर यांच्यातील भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना वचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना सवाल विचारण्यात आला की, शरद पवार आणि तुमची भेटी झाल्याबाबत चर्चा सुरु आहे. त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले होय आमची भेट झाली. पण त्यात कोणतीही राजकिय चर्चा झाली नाही. आम्ही भेटलो आणि कॉफी प्यायलो.
त्यावर एका प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने प्रश्न विचारला की, त्यांच्यासोबतची कॉफी गोड होती का, त्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, कॉफी कडूच होती. पण मी त्यात साखर घालून प्यायलो. त्यामुळे ती गोड लागल्याचे स्पष्ट केले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आजच्या भेटीत महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच आगामी निवडणूकीच्या निमित्तानेही कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.
तसेच पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आगामी पाच राज्यांच्या निवडणूकीनंतर मोदी हे काही तर आर्श्चयचकित करू शकतात असे भाकित करत मोदी म्हणजे आर्श्चय हे जणू समिकरणच असून प्रत्येक निवडणूकीच्या आधी ते काही तरी आर्श्चयच घडवून आणतात असेही स्पष्ट केले.
तसेच यावेळी मराठा आऱक्षणाच्या प्रश्नावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी प्रामाणिक रहावे. अन्यथा राज्यातील मराठा समाज वेगळी भूमिका घेऊ शकतो असेही सांगत राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देतो म्हणून शब्द दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या शब्दानुसार प्रामाणिक पणा दाखवावा असेही स्पष्ट केले.
यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यावर बोलताना म्हणाले की, माझा काँग्रेसला विरोध आहे म्हणून त्यांना वाटत असेल की मी भाजपासोबत येईन तर ते कधीही शक्य होणार नाही. माझा भाजपाला आणि त्यांच्या विचारधारेला विरोधच आहे असे स्पष्ट केले.
दरम्यान, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी शरद पवार प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीचे स्वागत केले असून भाजपाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांसोबत काँग्रेस नेहमीच आहे असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
तर अशोक चव्हाण म्हणाले, पवार-आंबेडकर भेट हा शुभ संकेत असल्याचे मत व्यक्त करत आज मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर व शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत असल्याचे मत व्यक्त केले.
सदर भेटीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना अशओक चव्हाण म्हणाले, माझी व्यक्तीगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी निवडणुकीमध्ये एकत्र आले पाहिजे. आज भलेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने किंवा आंबेडकरांच्या भाषेमध्ये कॉफी पिण्याच्या निमित्ताने एकत्र आल्याचे संकेत त्यांनी दिले; जे काही असेल ते सकारात्मक आहे आणि आगामी काळामध्ये यातून एक संवाद सुरू होईल. पुढील काळात वंचित आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्याच्या दृष्टीने काही चांगली सकारात्मक पावले पडावीत, अशी आपली इच्छा असल्याचे अशोक चव्हाीण यांनी यावेळी सांगितले.
आज मुंबईत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेली प्रकाश आंबेडकर व शरद पवारांची भेट ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. महाविकास आघाडीची पुढची सकारात्मक पावले पडण्याच्या दृष्टीने हा एक शुभ संकेत आहे.
माझी व्यक्तीगत इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी आणि महाविकास आघाडीने आगामी… pic.twitter.com/sfyyD5SyuS— Ashok Chavan (@AshokChavan1958) October 21, 2023