मुंबईः विशेष प्रतिनिधी
महाविकास आघाडीने मांडलेल्या अर्थसंकल्पाचे वर्णन म्हणजे खोदा पहाड निकला छोटेसे चुहे का तुकडा आणि भ्रमित सरकारचा अर्थसंकल्प असल्याची टीका करत हा अर्थसंकल्प सादर करायच्या आधी अजित पवार यांनी स्वतःचे २०१७ सालचे स्वतःचे भाषण तरी वाचायला हवे होते अशी उपरोधिक खोपरखळी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना लगावली.
या अर्थसंकल्पाने जनतेचे सामान्य ज्ञान बिघडविण्याचे काम केले असून हा केंद्राला पाठवायचे निवेदन होते की राज्याच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारा संकल्प होता अशी टीकाही त्यांनी केली.
अजित पवारांनी केंद्र सरकारकडून ८ हजार कोटी रूपये कमी आल्याचे सांगितले, मात्र केंद्राकडून वाढीव स्वरूपात आलेले १७ हजार कोटींच्या अनुदानाची गोष्ट सांगण्यास विसरले असल्याचा आरोप त्यांनी केला. १४ मार्च २०१७ सालचे अजित पवारांनी भाषण करताना स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प मांडला नसल्याचे सांगितले होते. मात्र त्यांनीही कृषी विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडला नाही. तसेच या तिन्ही पक्षांनी तयार केलेल्या किमान कार्यक्रम- समान कार्यक्रम तयार केला. त्यानुसार बेरोजगारांना ५ हजार रूपये देवू, कामगारांना २१ हजार वेतन देवू दुधाला उत्पनावर आधारीत दर देवू, ठिंबक योजनेला १०० टक्के अनुदान देवू सारखी आश्वासने दिली. मात्र यातील एकाही आश्वासनातील मुद्याचा उल्लेख या अर्थसंकल्पात नसल्याने हे सरकार म्हणजे गजनी सरकार असल्याची टीका त्यांनी केली.
अर्थमंत्र्यांनी ३१ हजार ३४३ कोटींच्या तूटीचा अर्थसंकल्प सादर करत मंदी असल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र यावर उपाय योजना सांगितल्या नाहीत. फक्त अधिकाऱ्यांनी लिहून दिलेला अर्थसंकल्प अजित पवारांनी वाचून दाखविल्याने. राज्याला दिशा नाही तर विनाश दाखविला असल्याची टीका करत सरकार लवकर गेल तरच आर्थिक मंदी दूर होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पवार आणि ठाकरेंसाठीच अर्थसंकल्प
गोलगोल फिरविणारा अर्थसंकल्प आहे. निश्चित स्वरूपाची तरतूद न करता केंद्राच्या योजनेवर आवरण घालून सांगणारा अर्थसंकल्प असून विभागवाराच्या गरजा पाहून तरतूदी करणारा यंदाचा अर्थसंकल्प नाही. यंदाचा अर्थसंकल्प हा पुणे जिल्हा आणि आणखी एका जिल्ह्याभोवती फिरणारा असून शेतकऱ्यांचा ७-१२ कोरा करण्याच्या अनुषंगाने कोणतेही ठोस उपाय योजना नाहीत. प्रशिक्षणालाच रोजगार म्हणून संबोधले आहे. या सरकारने भूखंडावरच डोळा ठेवण्यास सुरुवात केली असून वरळीचा भूखंडावर प्रकल्प उभारण्याचा निर्णय हा त्याचाच एक भाग आहे. पवार आणि ठाकरे यांच्यासाठीचाच हा अर्थसंकल्प असल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.