मुंबई : प्रतिनिधी
२४ फेब्रुवारीला रात्री निधन झालेल्या श्रीदेवी यांचे पार्थिव तीन दिवस झाले तरी अद्याप भारतात आलेले नाही. सुरुवातीला हृदयविकारच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात आले, पण काल दिवसभर ज्या घटना घडल्या त्यामुळे श्रीदेवींचे पार्थिव मुंबईत आणण्यास विलंब झाला. शवविच्छेदन अहवालामध्ये श्रीदेवी यांचा मृत्यू हृदयविकाराने नव्हे, तर अपघाती झाल्याचे नमूद करण्यात आल्याने सर्व परिस्थितीच बदलली.
श्रीदेवींच्या मृत्यूबाबतचे गूढ अधिकच वाढू लागले आहे. श्रीदेवी यांचा मृत्यू बथटबमध्ये बुडून झाल्याचे अहवालात म्हटल्याने त्यांचे पार्थिव ताब्यात घेऊन ते मुंबईत आणण्यास उशीर झाला आहे. तीन दिवसांच्या घटनांनंतर आज सरकारी वकिलांची परवागनी मिळाल्याने श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते. या संबंधीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असली तरी श्रीदेवी यांच्या कुटुंबियांना अद्याप अंतिम मंजूरी पत्र मिळाले नसल्याचे समजते. त्यामुळे श्रीदेवी यांचे पार्थिव नेमके किती वाजेपर्यंत मुंबईत पोहोचेल हे ठामपणे सांगितले जात नाही. श्रीदेवी यांच्या मृत्यू संबंधीची अधिक चौकशी सुरूच असल्याचे दुबई पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे.
अर्जुनच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्या
जीवंतपणी श्रीदेवी यांचा ज्याने कधी आई म्हणून स्वीकार केला नाही त्या अर्जुन कपूरच्याही हृदयाला ‘चांदणी’च्या अचानक जाण्याने पाझर फुटला आहे. आजवर श्रीदेवी यांना आई न मानणाऱ्या अर्जुनच्याही डोळ्यांच्या कडा ओलावल्याचे सूत्रांकडून समजते. श्रीदेवीसोबतच जान्हवी आणि खुशी या त्यांच्या मुलींशीही आपला काही संबंध नसल्याचे अर्जुन आजवर म्हणत होता, परंतु त्यांच्या पश्चात मात्र अर्जुनने दोघींनाही भावाच्या मायेने जवळ घेत सांत्वन केले आहे. इतकेच नव्हे तर आपल्या सावत्र आईचे पार्थिव मिळवण्यात होत असल्याचा विलंब सहन होत नसल्याने तो दुबईला जात असल्याचीही माहिती समोर आली आहे.