Breaking News

आशिष शेलारांनी ठाकरे सरकारला दिली रक्तपिपासूची उपमा रक्तपिपासू ठाकरे सरकारमुळेच एसटीच्या ४० कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई: प्रतिनिधी

आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आज भेट घेत ॲड आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साथ आणि समर्थन देत असल्याचे सांगत आणि सरकारला इशारा देत म्हणाले, की गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. ४० जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे सरकार रक्तपिपासू असल्याची घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.

एसटीचे राज्य शासनात विलनीकरण तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळणेसाठी मुंबईत आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा, साथ असल्याचे ॲड आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

शासकीय कर्मचाऱ्याला जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती द्या एवढीच मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे. राज्य सरकारला सर्व सहकार्य करु पण नाही केलतं तर आम्ही परत येतोय हे लक्षात ठेवा असा इशाराही त्यांनी दिला.

ही लढाई केवळ एसटी कर्मचाऱ्यांची नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब, दलित, पिडित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे. आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे. जिथे ८० हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय, त्यांना लाईट आणि पाण्याची ही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही असा सवाल ही त्यांनी केला. उद्या यासाठी महानगरपालिका आयुक्तांची यासाठी भेट घेणार असल्याच ही ते म्हणाले.

मायावी राक्षसासारख हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेलं हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे, मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *