मुंबई: प्रतिनिधी
मुंबईतील मराठी आर्किटेक्चर अन्वय नाईक यांच्या आत्महत्याप्रकरणी आरोपी यादीत असलेल्या पत्रकार अर्णब गोस्वामी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. सध्या अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली ते राजकिय हेतूने आरोप करून महाविकास आघाडी सरकारवर आरोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात असलेल्या त्या गुन्ह्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केली.
दिवंगत अन्वय नाईक यांच्या पत्नीचा पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात एक व्हिडिओ झालेला आहे. त्या व्हिडिओची प्रत माझ्याकडे असून त्यामध्ये अर्णब गोस्वामी चे नाव घेण्यात आलेले आहे. तसेच त्यांनी मानसिक छळ केल्याची तक्रार करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
याप्रकरणी गोस्वामीच्या विरोधात यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र त्यांचे केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपा नेत्यांशी संबध असल्याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच त्यासाठी केंद्रातील कोणत्या नेत्याने त्यावेळच्या राज्यातील नेत्यावर दबाव आणला याचाही शोध घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी करत बिल्डर परमार यांच्या आत्महत्येत त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटला आधार मानून त्यावेळी काही जणांना अटक करण्यात आली होती. त्याच आधारावर नाईक यांनी पैसे न दिल्याच्या कारणावरून आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये सांगत त्यास अर्णव गोस्वामी याचे नाव लिहिले. तरीही त्यांच्यावर अद्याप का कारवाई करण्यात आली नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.