नागपूर : प्रतिनिधी
विधानसभेत असलेले जे कोणी आहेत. त्या सर्वांना बोलण्याचा अधिकार आहे. त्यानुसार इथे असलेले आम्ही हे फक्त जाहीरातीसाठी किंवा प्रसिध्दीसाठी बोलत नसल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना लगावला.
तीनवेळा सभागृहाचे कामकाज तहकूबीनंतर सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांनी स्थगन प्रस्तावावर बोलण्याची परवानगी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे मागितली. त्यावर अध्यक्ष बागडे यांनी स्थगन प्रस्तावाचा विषय हा आधीच सभागृहाच्या कार्यक्रम पत्रिकेत असल्याने त्यावरील स्थगन प्रस्ताव फेटाळून लावत असल्याचे जाहीर केले.
अध्यक्षांच्या उत्तराने समाधान न झाल्याने दिलीप वळसे-पाटील यांनी खालून मिळणाऱ्या इशाऱ्यावर लक्ष देवू नका अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यावर अध्यक्ष बागडे यांनी मी लक्ष देत नसल्याचे स्पष्ट करत शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना बोलण्यास सांगितले.
त्यावर तावडे यांनी विरोधकांनी मागणी केल्याप्रमाणे स्थगन प्रस्ताव आणायचा झाल्यास तो राज्य सरकारचा प्रस्ताव येईल विरोधकांचा नाही. त्यामुळे उद्याच्या वर्तमानपत्रात विखे-पाटील यांच्यासह विरोधकांचे नाव येणार नाही. त्यामुळे विरोधकांना सरकारचा प्रस्ताव चालेल का? असा प्रतिप्रश्न केला.
त्यानंतर बोलण्यास उभे राहीलेल्या अजित पवार यांनी इथे सभागृहात असलेल्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही जाहीरातीसाठी किंवा प्रसिध्दीसाठी सभागृहात बोलत नसल्याचा टोला लगावत आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असल्याचे स्पष्ट केले.