भिवंडी: प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या तुघलकी कृषी कायदे रद्द करण्यासाठी आणि शेती मालाला किमान आधारभूत किंमत मिळावी यासाठी नवी दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील हजारो शेतकरी पायी आणि वाहन मार्चने मुंबईकडे रवाना होत आहेत. मुंबईत आल्यानंतर राज्यातील शेतकरी राजभवनला घेराव घालून आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने दिली.
२० हजार शेतकऱ्यांचा मार्च नाशिक मार्गे निघाला. ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचल्यावर घाटन देवी येथे मुक्कामी शनिवारी पोहोचला. त्यानंतर रविवारी सकाळी हा मार्च घाटनदेवी ते कसारा घाट हा १२ कि.मी.चे अंतर पायी तुडवत शहापूरला पोहोचला. पुढे नाशिक लेनने कसारा मार्गे मुंबईतील राजभवनच्या दिशेने जात आहे. या मार्चमध्ये अखिल भारतीय किसान सभेबरोबरच सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डिवायएफआय, एसएफआय या संघटना सहभागी झाल्या आहेत.
दिल्लीतील आंदोलन आणखीन बळकट करण्यासाठी २३ जानेवारी ते २६ जानेवारी या कालावधीत देशातील सर्व राज्यांमध्ये या डाव्या पक्षांकडून शेतकऱ्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी रात्री पर्यंत हा मोर्चा आझाद मैदानावर पोहोचणार आहे. सोमवारी शेतकऱ्यांच्या या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व नेते सहभागी होणार असून सकाळी ११ वाजता मैदानावर मोर्चा होणार आहे. सभेनंतर दुपारी २ वाजता राजभवनावर जावून निवेदन देणार आहेत.