मागील काही महिन्यापासून नगदी पिकं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांदा, द्राक्षे, कापूस आदींसह भाजीपाल्यास बाजारात चांगला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला आणि अडचणीला सामोरे जावे लागत असल्याने इच्छा मरणा परवानगी द्यावी अशी मागणी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे केली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील १०१ शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडत राष्ट्रपतींना पत्र पाठवित इच्छा मरणास परवानगी देण्याची मागणी केली.
चांदवड तालुक्यातील १०१ शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छामरणासाठी परवानगी देण्याची मागणी पत्राव्दारे केली आहे. जिल्ह्यातील चांदवड तालुका हा कांदा आणि द्राक्ष पीक घेणारा प्रमुख तालुका आहे.
केंद्र आणि राज्य सरकार कांदा, द्राक्ष तसेच भाजीपाला मालाला योग्य व रास्त बाजारभाव देण्यास असमर्थ ठरत आहेत. अत्यल्प भावामुळे शेतीमालाचा उत्पन्न खर्चही निघत नाही. हा खर्च भरून निघावा यासाठी कर्ज काढावे लागत असल्याने डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढत आहे. शेतकऱ्यांना कुटूंबाचे पालन पोषण करणे अशक्य झाले आहे. शेतकरी वर्गाला प्राणत्याग केल्याशिवाय पर्याय नाही, अशी स्थिती राज्य व केंद्र सरकारने निर्माण केली असल्याचे संजय जाधव यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी लोकप्रतिनिधींकडून आवाज उठविला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुसरा पर्याय नसल्याने शेतकऱ्यांना इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशा आशयाचे पत्र शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना पाठविले आहे.