राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत रहात असतात. नुकतेच त्यांनी मुंबई, ठाणेतून राजस्थानी आणि गुजराती लोक बाजूला काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून कोणी म्हणणार नसल्याचे वक्तव्य केले. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून सर्वच राजकिय पक्षांनी टीकेचे आसूड ओढले. भाजपाने राज्यपाल कोश्यारी यांच्यापासून चार हात लांब राहणे पसंत केले. त्यानंतर राज्यपालांनी राज्याची माफीही मागितली. मात्र राज्यपालांच्या त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी निशाणा साधला आहे.
यावेळी अमोल मिटकरी म्हणाले की, महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे भारतीय जनता पार्टीचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांनी राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून काळी टोपी घालून पूर्णवेळ संघाचं कार्य केलं, अशी बोचरी टीका केली.
मोदींमुळे भारतीयांना परदेशात मान मिळाला, या राज्यपालांच्या वक्तव्याचाही अमोल मिटकरींनी समाचार घेतला.
राज्यपाल हे भाजपाचे एजंट असून त्यांना लवकरात लवकर त्यांच्या राज्यात परत पाठवा, अशी मागणी करत एका खाजगी न्यूज सर्व्हीस संस्थेशी बोलताना ते म्हणाले, सध्याचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त विधानं करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे, ते राजकीय पद नाही. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राष्ट्राने आतापर्यंत २१ राज्यपालांचा कार्यकाळ पाहिला आहे.पण भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यपाल पदाची सूत्रं हाती घेतल्यापासून त्यांनी भाजपाचे एजंट आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केलं. त्यांच्या डोक्यावर अजूनही काळी टोपी कायम आहे. ते नरेंद्र मोदींचे पाठीराखे आहेत. त्यांनी बहुजन समाजाच्या आराध्य दैवतांवर वारंवार अश्लील टिप्पणी करून स्वत: प्रकाश झोतात राहण्याचं काम केलं. अनेकदा वादग्रस्त विधानं करून स्वत:वर वाद ओढून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली. महात्मा फुले यांच्याबाबत अपशब्द वापरले. मराठी माणसाचा अपमान केला, त्यानंतर माफी मागितली. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत इतिहासात राज्यपालांनी माफी मागण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात २१ राज्यपाल झाले, त्यांची कारकीर्द राजकारणापलीकडे होती असेही ते म्हणाले.