आता आपण मास्क काढून माईकवर बोलायला लागलो आहोत. मनात भरपूर बोलायचं आहे. बरच साचलंय नव्हे मला मनातलं मोकळं ढाकळं बोलायचे आहे. अनेकांच्या चेहऱ्यावर असलेले मास्क काढायचे आहेत असा सूचक इशारा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज विरोधकांचे नाव न घेता दिला.
मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी या अभियानाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, माजी महापौर किशोरी पेडणेकर, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
मनातलं बोलायचे आहे. त्यासाठी १४ तारखेला आपण जाहीर सभा घेत असल्याचे सांगत आपण मुंबईकरांसाठी एकाच तिकिटीवर सर्वठिकाणचा प्रवास योजना सुरु केली आहे. उद्या कोणी तरी बेस्टचे तिकिट काढेल आणि निवडणूकीच्या दरम्यान येईल आणि म्हणेल हे बघा माझ्याकडे तिकिट आहे असा चिमटा इच्छुक उमेदवारांना काढत तिकिटासाठीचा आधीच स्पष्ट केलेले बरं असे सांगत ते पुढे म्हणाले की, पाणी मोफत द्यावी अशी मागणी आताच महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी केली. मात्र पाणी मोफत दिले म्हणजे तुम्ही पात्र झालात असा होत नाही असा खुलासा करत मुंबईतल्या सगळ्यांसाठी पाणी द्यायचे म्हटलं तर पाणी आणायचे कोठून झाडे तोडून तेथे पाईपलाईन टाकून पाणी आणण्याचा पर्यावरणाचा ऱ्हास करून मला विकास साधायचा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
विरोधक म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा असा नाही होत. तुम्ही अच्छे दिनाची घोषणा करत सत्तेवर आलात. पण कुठे आहेत अच्छे दिन असा सवाल करत नुसती वाटच बघायची असा खोचक टोला भाजपाचे नाव न घेता लगावत तुम्ही जेव्हा एखादं आश्वासन देता तेव्हा ते पुर्ण करण्याची ताकद असली पाहिजे. राजकारणातील विरोधालाही एक दर्जा असावा लागतो. दुर्दैवाने तो दर्जा दिसत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
आम्हीही एखादं काम करतो किंवा आश्वासन दिल्यानंतर त्याची पुर्तता करतो. मात्र विरोधकांना ते काम केलेले दिसत नाही तर त्यांना फक्त नळतून येणारं गढूळ पाणीच दिसतं अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
माझ्या मनात बराच साचलंय साचलंय म्हणण्यापेक्षा मनातलं बोलायचं आहे. त्यासाठी आपण जाहिर सभा घेत आहोत. मला अनेकांच्या चेहऱ्यावरचे मास्क काढायचे आहेत असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला.