मागील सात वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आंतरराष्ट्रीयस्तरावर मोठा दबदबा असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र रशियाने युक्रेनवर केलेल्या लष्करी कारवाईमुळे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेन-पोलंड सीमेवर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी अखेर मोदी सरकारमधील चार मंत्र्यांना पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदींचा प्रभाव घटला की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
युक्रेनमध्ये शिक्षणासाठी युरोपबरोबरच इतर खंडातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. युक्रेनबरोबर रशियाचे वातावरण तप्त होण्यास सुरुवात झाल्याबरोबर अनेक देशांनी आपापल्या विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढले. परंतु मोदी सरकारला देशातील पाच राज्यातील निवडणूकांच्या व्यस्ततेमुळे या गोष्टीकडे लक्ष्य द्यायला वेळ नव्हता. मात्र जेव्हा प्रत्यक्ष रशियाने जेव्हा युक्रेनवर हल्ले करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोदी सरकारला नेहमीप्रमाणे उशीर झाल्यावर जाग आली. या भारतीय विद्यार्थ्यांना नेमके कसे बाहेर काढायचे यासंदर्भात भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे कोणत्याही सूचना नव्हत्या ना त्याविषयीचा आराखडा आखण्यात आला.
आता सर्वचस्तरावरून आणि त्या विषयीचे तेथील विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोदी सरकारला जाग आली आणि तेथील विद्यार्थ्यांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य सिंदीया, मंत्री हरदीप पुरी, किरेन रिजीजू आणि व्ही. के. सिंह या चार मंत्र्यांचे एका पथक तयार करण्यात आले.
मोदी सरकारचे चार मंत्री थेट युद्धजन्य युक्रेनच्या शेजारी युरोपीयन देशांमध्ये जाणार आहेत.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंत्र्यांसह वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यात त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाची स्थिती आणि युक्रेन सोडून मायदेशी परतणाऱ्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेवर चर्चा केली. यानंतर युक्रेनच्या सीमावर्ती देशात केंद्रीय मंत्र्यांनी जाऊन तेथील बचाव कार्याचा समन्वय करण्याचा निर्णय झाला.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे रोमानिया आणि मोलदोव्हा, किरने रिजीजू यांच्याकडे स्लोव्हाकिया, हरदीप पुरी यांच्याकडे हंगेरी आणि व्ही. के. सिंह यांच्याकडे पोलंडची जबाबदारी सोपविण्यात आली. हे सर्व मंत्री जबाबदारी दिलेल्या देशांमधील प्रशासनाच्या संपर्कात राहून भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
रशिया-युक्रेन युद्धात सुमारे १६ हजार भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत. तेथे अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील सर्व हवाई क्षेत्र बंद करण्यात आले आहे, त्यामुळे सरकारला तेथील भारतीय नागरिकांना बाहेर काढणे कठीण झाले आहे.
युक्रेनमध्ये मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी अडकले आहेत, हे सर्व विद्यार्थी भारत सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. मूळची अमृतसरची असलेल्या एका विद्यार्थ्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी तळघरात आश्रय घेतल्याचे दिसत आहे. हे सर्व विद्यार्थी त्यांच्या वसतिगृहाच्या तळघरात असून, ते खूप घाबरलेले दिसत आहेत.