Breaking News

मोदी काळातील बँक घोटाळ्यावरून पुन्हा एकदा राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा एबीजी शिपयार्ड लि विरोधात गुन्हा दाखल

मराठी ई-बातम्या टीम

देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणूकांची प्रक्रिया सुरु झाल्यापासून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठविली आहे. परंतु राहुल गांधी यांच्याकडून उपस्थित करण्यात येत असलेल्या राजकिय प्रश्नांवर पंतप्रधानांनी अद्याप निश्चित उत्तर दिल्याचे दिसून येत नसताना आज पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी मोदी काळात ५ लाख ३५ हजार कोटींचे आर्थिक घोटाळे झाल्याचा आरोप करत मोदींच्या मित्रांना अच्छे दिन आल्याची खोचक टीका ट्विट करत केली.

भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या संघाची कथितरीत्या २२ हजार ८४२ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याबद्दल केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) एबीजी शिपयार्ड लि. आणि तिचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह इतरांविरुद्ध काल (शनिवार) गुन्हा दाखल केला. काल दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती. हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदींच्या काळात आतापर्यंत ५ लाख ३५ हजार कोटी रुपयांची बँक फसवणूक झालेली आहे. ७५ वर्षांमध्ये भारतातील जनतेच्या पैशाची एवढी फसवणूक झालेली नाही. लूट आणि फसवेगिरीचे हे दिवस फक्त मोदी मित्रांसाठी ‘अच्छे दिन’ असल्याची खोचक टीकाही त्यांनी केली.

तर, अग्रवाल यांच्या व्यतिरिक्त सीबीआयने तत्कालीन कार्यकारी संचालक सनातनम मुत्तुस्वामी, संचालक अश्विनी कुमार, सुशीलकुमार अग्रवाल व रवी विमल नेवेतिया, तसेच दुसरी एक कंपनी एबीजी इंटरनॅशनल प्रा.लि. यांनाही गुन्हेगारी स्वरूपाचे कारस्थान, फसवणूक, फौजदारी स्वरूपाचा विश्वासघात आणि पदाचा गैरवापर या आरोपांखाली भारतीय दंड संहिता व भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये नोंदवलेल्या गुन्ह्यात आरोपी केले आहेत. यासंदर्भात सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियानं तक्रार दाखल केली होती. फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार, एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीमध्ये आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून बेकायदेशीर कृत्य, निधी बँकेनं दिलेल्या कारणाव्यतिरिक्त दुसरीकडे वळवणे अशा गोष्टी केल्याचे समोर आले.

Check Also

तीन व्यापारी संघटनांनी नव्या कर आकारणीवरून घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव ती दुरुस्ती रद्द करण्याची केली मागणी

तीन व्यापारी संघटनांनी सूक्ष्म आणि लघु उद्योगांना देय देण्यासंबंधीच्या नवीन आयकर तरतुदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *