मुंबई: प्रतिनिधी
शहरातील गोरेगावातील म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकास प्रकल्पातील वाधवान बिल्डरला वाचविण्यासाठी भाजपातील एका बड्या नेत्याने चार वर्षे सातत्याने पाठीशी घालत त्याला क्लीनचीट दिली. विशेष म्हणजे या वाधवानला वाचविण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यावर कारण नसताना निलंबित करण्याचा प्रकार या नेत्याने केला. त्याच नेत्याने आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांच्याकडून वाधवान यांना पत्र उपलब्ध करून देण्यास मदत केल्याची चर्चा मंत्रालयातील अधिकारी वर्गात रंगली आहे.
वाधवान यांना गुप्ता यांनी दिलेले पत्र हे मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयातून पत्र देण्यात आले नाही. तर त्यांच्या घरून हे पत्र वाधवान कुटुंबियाना देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भाजपामधील एका बड्या नेत्याने गुप्ता यांना फोन केला होता. त्या फोननंतरच गुप्ता यांनी वाधवान यांना पत्र दिल्याचेही सांगण्यात येत आहे.
दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी वाधवान ग्रुप हा भाजपाचा प्रमुख देणगीदार राहिला आहे, त्याच्या बदल्यात भाजपाने वेळोवेळी वाधवानची मदत केलेली आहे. वाधवान कुटुंबातील २३ जणांच्या महाबळेश्वर पर्यटनासाठी पत्रप्रपंच करणारे गृहविभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची नियुक्ती ही फडणवीस सरकारनेच केलेली आहे. महाबळेश्वरला जाण्यासाठी जे पत्र देण्यात आले त्यामागे भाजपाच्याच बड्या नेत्याने ‘शब्द टाकला’ असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचा आरोप केला.
महाविकास आघाडी सरकारने गुप्तांवर कारवाई केलेली आहे, आता पुढची कारवाई मोदी सरकारने हिम्मत असेल तर करावी असे आव्हान देत वाधवान आणि भाजपाचे घनिष्ठ संबंध असून भारतीय जनता पक्षाला वाधवान ग्रुपच्या अनेक कंपन्यांनी भरघोस फंड दिलेला आहे. या वाधवान कंपनीच्या (DHFL) दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड या ग्रुपमार्फत निर्माण झालेल्या आरकेडब्ल्यू डेव्हलपर प्रा. ली., स्कील रिअलटर्स प्रा. ली. व दर्शन डेव्हलपर्स या कंपन्यांमार्फत भाजपाला २० कोटी रुपयांची देणगी देण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे या कंपन्या शेवटच्या तीन आर्थिक वर्षात नफ्यात नसल्याने त्यांना एवढी देणगी देता येत नाही. अत्यंत गुढ पद्धतीने झालेल्या या व्यवहारात भाजपाने निवडणूक आयोगाला यातील दोन कंपन्यांचे PAN Details सुद्धा दिले नाहीत. यातून भाजपा सरकारने केलेल्या मेहरबानीतून हा व्यवहार झाल्याचे नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच वाधवान कंपनीच्या प्रिव्हिलेज हायटेक कंपनीकडून विजयदुर्ग बंदर विकसीत करण्यात येत आहे त्यातही भारतीय जनता पार्टीचे खासदार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास विश्वासू सहकारी आर. चंद्रशेखर यांच्या कंपनीची भागिदारी आहे. यातूनच वाधवान व भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे घनिष्ठ आर्थिक लागेबांधे असल्याचा आरोप त्यांनी केला.